कोल्हापूर : कोल्हापुरात आज अपघाताच्या भीषण घटना घडल्या आहेत. आजरा तालुक्यातील उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर झालेल्या अत्यंत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत झाला. दुचाकी आणि टेम्पोची धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने अवघं हसत खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. अशातच जिल्ह्यातील शिरोली जकात नाका परिसरात भीषण अपघात झाला आहे. 40 फूट खोल दरीत कार कोसळून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर झालेल्या अत्यंत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत झाला. दुचाकी आणि टेम्पोची धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने अवघं हसत खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. या भीषण अपघातामध्ये दीपक चांदे (वय 39), त्यांची पत्नी शोभा (वय 35) त्यांची दोन मुले जय (वय 10) आणि मुलगी पूर्वा (वय 7) यांचा जागीच मृत्यू झाला. चांदे कुटुंबीय वास्तव्यास मुंबईत आहे. मात्र, सुट्टीचा महिना असल्याने गावी आले होते. दीपक चांदे यांनी मुंबईत मेहनत करत आजरा तालुक्यातील व्होन्याळी गावामध्ये घर बांधलं होता. सुट्टी संपत आल्याने त्यांनी मुंबईकडे उद्या (5 जून) जाण्यापूर्वी पाहुण्यांच्या भेटीसाठी दुंडगे गावी जात होते. मात्र, आयशर ट्रेम्पोने दिलेल्या धडकीत अवघ्या कुटुंबाचा जागीच अंत झाला.
दीपक चांदे यांनी गावी घर बांधल्यानंतर गावी येण्याचा बेत केला. सर्वजण उन्हाळी सुट्टीसाठी गावी आले होते. नवीन घर बांधून पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी संपूर्ण कुटुंब मुंबईहून गावाकडे आले होते. सुट्टी संपत आल्याने उद्या मुंबईला परत जाणार होते. मात्र त्याआधी पाहुण्यांना भेटीसाठी दुचाकीवरून दुंडगे गावी निघाले होते. मात्र, मध्येच टेम्पोची धडक बसल्याने चौघेही जागीच मृत पावले.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी –
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली जकात नाका परिसरात भीषण अपघात झाला आहे. कार 40 फूट खाली दरीत कोसळून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


