डोंबिवली : डोंबिवलीमध्ये गेल्या काही महिन्यात गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून गुन्हेगारांना पोलिसांचा काही धाक उरला आहे की नाही, असाच प्रश्न सध्या निर्माण होत आहे. त्याचं कारण म्हणजे नुकतीच झालेली चोरी. चोरट्यांनी चक्क पोलिस स्टेशनच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्येच हात साफ करत लाखोंचा माल लुटला. जवळपास 9 ते 10 दुकानांवर डल्ला मारत चोरट्यांनी तिथला मार चोरला. दुकानांचं शटर तोडून ही चोरी करण्यात आली. पोलिस स्टेशन अवघ्या हाकेच्या अंतरावर असतानाही चोरट्यांनी ही क्लुप्ती केल्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा, पोलिसांचा काहीच धाक न उरल्याचे बोलले जात आहे.
काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये तर तीन चोरटे मध्यरात्री शटर उघडून चोरी करताना दिसत आहेत. व्यापाऱ्यांनी सुरक्षा डोअर व शटर लॉक लावूनही चोरी घडल्याने खळबळ माजली आहे. ज्या परिसरात पोलिस स्टेशन एवढ्या जवळ ाहे तेथे चोरी होतेच कशी, पोलिसांचा काहीच धाक नाही का, कायदा-सुरक्षाव्यवस्थेचं काय ? असे अनेक सवाल व्यापारी वर्गाकडून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान याप्रकरणी सध्या रामनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास वेगाने सुरू आहे. मात्र या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.