मुंबई : पालघर एक्सप्रेस शार्दूल ठाकूर हा गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाासून दूर आहे. शार्दूलला गेल्या काही मालिकांमध्ये संधी देण्यात आली नाही. शार्दुलचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी समावेश करण्यात आला नाही. तसेच निवड समितीने शार्दूलला इंग्लंडविरुद्धच्या टी 20 आणि वनडे सीरिजसाठीही संधी दिली नाही. मात्र शार्दूलने यानंतरही देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी सुरु ठेवली आहे. शार्दूलने रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक झळकावलं होतं. शार्दूलने त्यानंतर आता मेघालयविरुद्धच्या करो या मरो सामन्यात हॅटट्रिक घेत धमाका केला आहे.
मुंबई क्रिकेट टीमने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील अटीतटीच्या सामन्यात अप्रितम सुरुवात केली आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्याला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये मेघालयाचा करेक्ट कार्यक्रम केला. ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याने घेतलेल्या हॅटट्रिकने मेघालयच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं. त्यामुळे मेघालयला 100 धावाही करता आल्या नाहीत. मेघालयचा डाव हा अवघ्या 86 धावांवर आटोपला. त्यामुळे आता मुंबईकडे पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारून भक्कम आघाडी घेण्याची संधी आहे. मुंबईसाठी हा ‘आर या पार’ असा सामना आहे. त्यामुळे आता मुंबईचे फलंदाज कशी कामगिरी करतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
शार्दुलने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील सातव्या राउंडमध्ये मेघालयविरुद्ध खेळत आहे. हा सामना मुंबईतील बीकेसी शरद पवार अकादमीत खेळवण्यात येत आहे. मुंबईने टॉस जिंकून मेघालयला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शार्दुलने मेघायलला सामन्यातील पहिल्याच ओव्हरमधील चौथ्याच चेंडूवर पहिला झटका दिला. शार्दूलने निशांता चक्रवर्ती याला आऊट केलं. त्यानंतर शार्दुल मेघालयच्या डावातील तिसरी आणि त्याच्या कोट्यातील दुसरी ओव्हर टाकायला आला. शार्दुलने या ओव्हरमधील शेवटच्या 3 चेंडूवर सलग 3 विकेट्स घेत हॅटट्रिक पूर्ण केली.
शार्दूलने चौथ्या बॉलवर अनिरुद्ध बी याला आऊट केलं. अनिरुद्ध बोल्ड झाला. त्यानंतर सुमित कुमार कॅच आऊट झाला. शम्स मुलानी याने सुमितचा कॅच घेचला. त्यानंतर शार्दुलने ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर जसकीरतला क्लिन बोल्ड केलं. शार्दूलने अशाप्रकारे हॅटट्रिक घेतली. विशेष म्हणजे शार्दुलने या तिघांपैकी एकालाही भोपळा फोडू दिला नाही. शार्दुलने घेतलेल्या या हॅटट्रिकमुळे मेघालयची स्थिती 5 बाद 2 अशी झाली.