वीज ग्राहकांच्या सभेत उमटल्या संतप्त प्रतिक्रिया, ग्राहकांनी वाचला समस्यांचा पाढा.! ; वीज ग्राहकांची उदासीनताचं ग्राहकांच्या नुकसानीला कारणीभूत.! : दीपक पटेकर यांची खंत.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या संयुक्त बैठकीत वीज ग्राहकांकडून सावंतवाडी तालुक्यातील अनेक समस्या मांडण्यात आल्या. यात प्रामुख्याने महावितरण कंपनीने ग्राहकांना अनामत रक्कम (डिपॉझिट) भरण्याची मागणी केल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात गुरुवारी येथील नगर परिषदेच्या पत्रकार कक्षाजवळील सभागृहात वीज ग्राहकांच्या बैठकीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या बैठकीत जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे प्रभारी अध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी वीज ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, वीज वितरण कंपनीने ग्राहकांना अनामत रक्कम भरण्याबाबत वेगळी बिले पाठवली आहेत. यापूर्वी सुद्धा अशीच डिपॉझिट भरण्यासंदर्भात बिले पाठवली होती. असे डिपॉझिट यापूर्वी देखील भरलेले असताना पुन्हा डिपॉझिट भरण्याची नोटीस का बजावण्यात आली? असा सवाल दिलीप वाडकर यांनी केला. ही अन्यायकारक बाब असल्याचेही ग्राहकांनी स्पष्टपणे सांगितले. जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत सांगितले की, ग्राहकांच्या या तक्रारी मुंबई येथील व्यवस्थापन संचालक श्री.फाटक व प्रतापगड या मुख्य कार्यालयातील संचालक लोकेशचंद्र यांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील आणि डिपॉझिटची रक्कम न घेण्याची विनंती केली जाईल. या बैठकीत वीज ग्राहकांनी अनेक समस्या मांडल्या. ओटवणे येथे ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याची तक्रार संतोष तावडे यांनी मांडली. तसेच, जिल्ह्यातील अनेक ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला संरक्षक कंपाउंड नसल्यामुळे उघड्या डीपीमुळे अपघात होण्याची भीती आहे, असेही महेश खानोलकर यांनी सांगितले. या संदर्भात लेखी तक्रार देऊन अधीक्षक अभियंता यांचे लक्ष वेधण्यात येईल, असे आश्वासन ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी दिले. बैठकीत दिलीप वाडकर यांनी सावंतवाडी शहरातील वीज ग्राहकांना कोणी वालीच नसल्याचे सांगितले. दिवसातून दहावेळा झाडी तोडण्याच्या कारणांसाठी वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याचे तसेच अनेक वीज खांब कमकुवत झाले आहेत, वीज वाहिन्या लोंबकळत आहेत, त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शहरात पावसाळ्यापूर्वी झाडी तोडण्यात यावी आणि अनामत रकमेच्या मागणीवर फेरविचार करावा, अशी सूचना त्यांनी मांडली. हरिचंद्र मांजरेकर यांनी शहरातील लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. तर, इन्सुलीचे उल्हास सावंत यांनी ग्रामीण भागातही विजेचे खांब वाकले असून वीज वाहिन्या लोंबकळत आहेत त्यामुळे धोका निर्माण झाला असल्याचे सांगितले. दोन खांबांमधील अंतर कमी करावे जेणेकरून हा धोका टाळता येईल. शैलेश कुडतरकर यांनी सावरवाड ग्रामपंचायतीमध्ये कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने नळ योजनेचा पंप चालत नसल्याची समस्या मांडली. यावेळी महेश खानोलकर, समीर शिंदे, विनायक राऊळ, संदीप सुकी, तुकाराम म्हापसेकर, शांताराम वारंग, आत्माराम स्वार, राजेश मोरजकर, मनोज घाटकर आदींनी आपल्या भागातील समस्या मांडल्या.
जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत 25 एप्रिल रोजी कुडाळ येथे अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हे प्रश्न मांडले जातील आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्राहकांनी आपल्या लेखी तक्रारी महावितरण कडे देऊन पोच घेतलेल्या कॉपीच्या प्रती संघटनेकडे द्याव्यात, जेणेकरून अधिकाऱ्यांना नेमकी समस्या सांगून ती सोडवता येईल. यापूर्वी आलेल्या लेखी तक्रारी संघटनेने सोडवल्या होत्या, त्यामुळे आताही ग्राहकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. प्र.अध्यक्ष संजय लाड यांनी सांगितले की, वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरलाही वीज ग्राहक संघटनेने विरोध केला आहे. मात्र, काही लोकप्रतिनिधी स्मार्ट मीटर बसविणे विरोधात ठराव घेतात तर त्यांचेच सहकारी स्मार्ट मीटर बसविण्याची कंत्राटे घेतात, ही चुकीची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले. जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी सांगितले की, संघटना वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वीज ग्राहकांचे प्रश्न घेऊन जाते, परंतु ग्राहकांची उदासीनता ग्राहकांच्या नुकसानीला कारणीभूत ठरते. ग्राहक जागृत राहिले आणि उत्पन्न होणाऱ्या समस्यांच्या लेखी तक्रारी केल्या आणि पोच घेतलेली एक प्रत संघटनेकडे दिली तर आपण दिलेल्या तक्रारी संघटनेमार्फत अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या जातील, त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि त्यानंतर त्यांच्याकडून येणाऱ्या उत्तराची माहिती ग्राहकांना दिली जाईल.

ADVT –

खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

ADVT – वाढदिवस अभीष्टचिंतन..! – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्य कु. सिद्धी पारकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles