मुंबई : मुंबई क्लायमेट वीक २०२६ अंतर्गत Jio World Convention Centre येथे “Bamboo Value Chains — Driving Agro-Economic Growth in Maharashtra” या विषयावर उच्चस्तरीय, बंद-द्वार धोरणात्मक गोलमेज परिषद पार पडली. या महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन Transform Rural India Foundation (TRIF), Maharashtra Institution for Transformation (MITRA) आणि World Resources Institute India (WRI India) यांनी संयुक्तपणे केले होते.

या परिषदेत राज्यातील बांबू मूल्यसाखळी अधिक सक्षम करण्याबाबत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या भागधारकांनी सखोल चर्चा केली. कृषी-आधारित आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी बांबू क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

यावेळी संजीव कर्पे यांनी बाजारपेठ-केंद्रित बांबू परिसंस्थेबाबत आपले विचार मांडले. बांबू लागवडीचा विस्तार, औद्योगिक प्रक्रिया क्षमता वाढविणे, मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती आणि प्रभावी बाजारपेठ एकत्रीकरण या माध्यमातून महाराष्ट्रात ग्रामीण रोजगारनिर्मिती, हवामान प्रतिकारशक्ती आणि हरित औद्योगिक विकासाला चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.

चर्चासत्रातील संवाद धोरणात्मक, स्पष्ट आणि कृतीप्रधान होता. शासन, उद्योग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून बांबू क्षेत्राला नवसंजीवनी देत ते महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाचे महत्त्वाचे साधन ठरू शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



