वेंगुर्ला येथे करिअर कट्टा संसद शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न. ; विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या दिशा!

वेंगुर्ला : शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत करिअर कट्टा संसद शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, करिअरविषयक जागरूकता, कौशल्य विकास, उद्योजकता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) डी. बी. गोसावी होते. यावेळी संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा. डी. बी. राणे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एस. एम. माने, तसेच प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी करिअर कट्टा समन्वयक प्रा. प्रियांका प्रभू यांनी उपस्थितांचे स्वागत करून करिअर कट्टा उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर नव्याने निवड झालेल्या करिअर कट्टा संसद पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
यामध्ये मयुरेश सखाराम सौदागर यांची मुख्यमंत्री, साध्वी अनंत मिंडे यांची नियोजन मंत्री, श्रद्धा लाडू पालव यांची सामान्य प्रशासन मंत्री, विभा निलेश होडावडेकर यांची माहिती व प्रसारण मंत्री, विनय विलास पालकर यांची उद्योजकता विकास मंत्री, चिन्मय शेखर मेस्त्री यांची रोजगार व स्वयंरोजगार मंत्री, प्रणव लाडू सकपाळ यांची संसदीय कामकाज मंत्री, रसिका मंगेश ठाकूर यांची कौशल्य विकास मंत्री, पूर्वा सुधीर वेंगुर्लेकर यांची महिला व बालविकास मंत्री, सर्वेश किशोर देवजी यांची कायदे व शिस्तपालन मंत्री तर सुजल भिकाजी गावडे यांची संसद सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याची शपथ घेतली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रा. (डॉ.) डी. बी. गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसून विद्यार्थ्यांनी नेतृत्वगुण, संवादकौशल्य, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. करिअर कट्टा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी व्यासपीठ असून त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध संधी उपलब्ध होतात.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे, कर्मचारी निवड आयोग तसेच इतर स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन मिळते. तसेच सीए, सीएमए, सीएस, एमबीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांविषयी माहिती मिळून विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या दिशा उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्यपूर्ण प्रयत्न, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनी रोजगार शोधणारे न बनता रोजगार निर्माते बनण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विवेक चव्हाण यांनी केले, तर डॉ. व्ही. एम. पाटोळे यांनी आभार मानले

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles