मुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी सिंधुरत्न समृद्ध योजनेला राज्य शासनाने पुन्हा एकदा बळ दिले आहे. या योजनेची तीन वर्षांची मुदत मार्च २०२५ मध्ये संपुष्टात आली होती. मात्र कोकणाच्या विकासासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याने तिला मुदतवाढ देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
याबाबत सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून योजना पुढे सुरू ठेवण्याची मागणी केली होती.
दरम्यान, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शासनाने “सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0” पुढील तीन वर्षांसाठी राबविण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. पायाभूत सुविधा, पर्यटन, मत्स्य व्यवसाय, शेती, उद्योग आणि रोजगार निर्मिती या विविध क्षेत्रांना चालना देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले. कोकणाच्या विकासासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत त्यांनी या योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात विकासकामांना अधिक वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
कोकणातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, पर्यटनाला चालना देणे आणि स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 मुळे आगामी काळात कोकणाच्या विकासाला नवे बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



