सावंतवाडी: तालुक्यातील एका वस्तीगृहातील तीन अल्पवयीन मुली काल रात्री उशिरा वस्तीगृहाच्या अभिरक्षकांच्या ताब्यातून निघून गेल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता, अल्पवयीन मुलींचा विषय असल्याने अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुली बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. संबंधित मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाण्याचा संपूर्ण फौजफाटा रात्रभर कार्यरत होता. शहरातील विविध भाग, एसटी बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच इतर संभाव्य ठिकाणी कसून शोधमोहीम राबविण्यात आली.
अखेर आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तिन्ही अल्पवयीन मुलींना सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले. सध्या त्यांची आवश्यक चौकशी करण्यात येत असून पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.



