सावंतवाडी : ‘रामकृष्ण हरी’च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या भक्तिमय निनादाने तळवडे नगरी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली. भजनप्रेमी आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नामस्मरण चक्रीभजन महोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि पारंपरिक सांस्कृतिक वातावरणात दिमाखात संपन्न झाला.
या भक्तिमय सोहळ्याला भाजप महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब तसेच सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी उपस्थित राहून भजनप्रेमी, ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी सदस्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना युवा नेते विशाल परब म्हणाले, “भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्या गावची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपली जात आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अशा भक्तिमय उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची, अध्यात्मिक परंपरेची आणि संतांच्या विचारांची ओळख होते. तळवडे ग्रामस्थांनी एकत्र येत आयोजित केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.”

महोत्सवादरम्यान विविध भजन मंडळांनी पारंपरिक भजनांचे सादरीकरण करत वातावरणात भक्तीची चैतन्यलहर निर्माण केली. ‘रामकृष्ण हरी’च्या नामघोषाने दुमदुमलेला परिसर, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने भारावलेले वातावरण यामुळे संपूर्ण सोहळ्याला आध्यात्मिक उंची लाभली.
या कार्यक्रमास रुपेश राऊळ, रवींद्र काजरेकर (माजी सरपंच), आप्पा परब (तळवडे सोसायटी चेअरमन), सुनील परब (प्रमुख गावकर), शाम गावडे, काशिनाथ कुंभार, श्री. प्रमोद गावडे, श्री. राजाराम गावडे ( पत्रकार), श्री. आनंद बुगडे, श्री. सुनील सावंत (जिल्हा बँक व्यवस्थापक), श्री. चिंतामणी जाधव, श्री. रमेश परब, श्री. गजानन परब, श्री. बाळा जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, भजनप्रेमी आणि देवस्थान कमिटी सदस्य उपस्थित होते.
गावची एकजूट, भक्तीची अखंड ज्योत आणि संस्कृतीच्या संवर्धनाचा संकल्प यांचा सुंदर संगम या चक्रीभजन महोत्सवातून अनुभवायला मिळाला. तळवडे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा महोत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता नव्या पिढीला आपल्या समृद्ध परंपरेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू ठरला.



