सावंतवाडी : गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि एकोप्याची परंपरा अधिक बळकट करण्याच्या दिशेने वेत्ये गावाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सागर गावडे यांची सर्वानुमते व बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे गावातील तंटे सामोपचाराने सोडवून सामाजिक ऐक्याची वीण अधिक घट्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गावातील विविध प्रश्नांवर संवाद, समन्वय आणि सामंजस्याच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी तंटामुक्ती समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या पार्श्वभूमीवर सागर गावडे यांच्यावर सोपविण्यात आलेली अध्यक्षपदाची जबाबदारी ही त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाची पावती मानली जात आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष सागर गावडे यांचे वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गावातील शांतता, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा कायम राखण्यासाठी तंटामुक्ती समिती प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘वादापेक्षा संवाद, संघर्षापेक्षा समन्वय आणि मतभेदांपेक्षा गावहित’ या भूमिकेतून तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून वेत्ये गावाला अधिक सक्षम आणि सलोख्याचे गाव बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



