माननीय मुख्यमंत्री महोदय,
मी एक जागरूक नागरिक म्हणून आणि आपल्या राज्यातील एक महिलेच्या नात्याने हे पत्र लिहित आहे. आपल्या महाराष्ट्रात, आपली संस्कृती, परंपरा, आणि मूल्ये हीच आपली ओळख आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत आपण एका चिंताजनक वास्तवाचा सामना करत आहोत – आपल्या राज्यात वाढत चाललेल्या बलात्कारांच्या घटना.
आज आपल्या महाराष्ट्रातील महिला आणि मुली सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्यात आहेत. शाळांपासून घरांपर्यंत, सार्वजनिक ठिकाणांपासून कामाच्या ठिकाणांपर्यंत, स्त्रिया आणि मुलींना असुरक्षिततेची भावना वाटू लागली आहे. बदलापूरसारख्या शाळांमध्ये लहान मुलींवर होणारे अत्याचार आपल्या समाजासाठी एक गंभीर आव्हान बनले आहेत.
प्रत्येक निवडणुकीच्या वेळी, आपले राजकीय पक्ष वचनबद्धतेच्या अनेक आश्वासनांसह आपल्या दारात येतात. परंतु, या वचनांना पूर्ण करण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत का, हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारच्या घटनांना रोखण्यासाठी आपण तात्काळ आणि कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.
राजकीय पक्षांनी अशा दुर्दैवी घटनांचा राजकीय फायदा घेण्याऐवजी, आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची आणि या गंभीर समस्येवर ठोस उपाय शोधण्याची वेळ आली आहे. ह्या घटनांना राजकीय रंग न देता, सर्व पक्षांनी सहकार्याने आणि ठोस पावले उचलून, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहावे, ही माझी आग्रहाची विनंती आहे.”
माझी नम्र विनंती आहे की, आपण या घटकांना कठोर शिक्षा देण्यासाठी कायदेशीर कारवाईत कठोरता आणावी. बलात्काराच्या घटनांवर कठोर कायदे तयार करून, त्यांना जलदगतीने न्याय देणाऱ्या प्रक्रिया अस्तित्वात आणाव्यात.
मी आपल्याला आणि आपल्या सरकारला हे आवाहन करते की, आपण या समस्येचे गंभीरपणे निराकरण कराल आणि महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलाल.
धन्यवाद..!
तुमची लाडकी बहीण
साक्षी राजेश शेटये..
कणकवली जि. सिंधुदुर्ग.