कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार! ; विदर्भ – मराठवाड्यात ‘अशी’ असणार परिस्थिती.

पुणे : पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरातून वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण व घाट भागात पुढील चार, पाच दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि रायगड आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारी कोकण, घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे शहरासह जिल्हा आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ऊन ढगाळ हवामान वारे असे संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. मुंबईत सोमवारी सकाळी ढगाळ वातावरण आहे.

विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस –

विदर्भात अजूनही पावसाने जोर धरलेला नाही. यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. परंतु पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. नागपूर जिल्ह्यत अजूनही सरासरी पाऊस नाही. यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. किमान शंभर मिमी पावसानंतरच पेरणी करा, असा सल्ला कृषी विभागाने दिला असला तरी काही भागात हलकसा पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. नागपूर जिल्ह्यात चार लाख 69 हजार 432 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 57 हजार 147 हेक्टर वर पेरणी करण्यात आली आहे.

मराठवाड्यातही पावसाची तूट –

यंदा मे महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला. मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला. परंतु जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनने ब्रेक घेतला. मराठवाडा, विदर्भात जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली नाही. दोन्ही विभागात पावसाची तूट नोंदवली गेली. धाराशिवमध्ये मे महिन्यातच पावसाने सुरुवात केली. मात्र, जून महिन्यामध्ये पावसाने उघडीप दिल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यावर संकट उभा राहिले आहे. धाराशिव जिल्ह्यात गेली बारा ते पंधरा दिवसापासून पाऊस नाही. जूनमध्ये कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत चांगला पाऊस झाला. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles