ज्या बापाने वाढवलं, त्यालाच घराबाहेर काढलं! ; सांगलीत नेमकं काय घडलं?

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात संपत्तीच्या वादातून नात्यांची अब्रू वेशीवर टांगणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या वडिलांच्या खांद्यावर बसून मुलगा मोठा झाला. त्याच वडिलांना मुलाने संपत्तीच्या हव्यासातून घराबाहेर काढले. एवढेच नव्हे तर आपल्या सख्ख्या बहिणींवरही जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जोतिराम माळी यांची बहीण उज्वला या १५ सप्टेंबर रोजी आईच्या श्राद्धासाठी घरी नैवेद्य देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी जोतिराम माळी याने वडील दगडू माळी यांच्यावर काठीने हल्ला केला. या हल्ल्यात बहीण उज्वला गंभीर जखमी झाली. तिला सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु होते. विशेष म्हणजे या हल्ल्यात जखमी झालेल्या वडील आणि बहिणींनी पोलिसात तक्रार दाखल करण्यापूर्वीच आरोपी मुलगा जोतिराम माळी याने पोलिसात खोटी तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्याने वडील दगडू माळी आणि बहि‍ण उज्वला या दोघांवर गंभीर आरोप केला.

पीडित बहिण काय म्हणाली?

यानंतर वडील आणि मुलगी उज्वला यांनी पोलिसात धाव घेतली. विट्यातील जोतिबा सेल्सचे मालक जोतिराम माळी आणि अनिता माळी यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. मी गेल्या चार वर्षांपासून वडिलांना सांभाळते. त्या दोघांनी माझ्या वडिलांना घरातून हकलून दिलं आहे. मी आईच्या श्राद्धानिमित्त दर्शनासाठी जाताना आम्हाला घरात जाऊ दिलं नाही. त्यावेळी आमच्यावर हल्ला केला. तो आम्हाला त्रास देतोय, आम्हाला जीवे मारण्याची धमकी देतोय. आमच्यावर हल्ला करून तो मोकाट फिरत आहे. आम्ही मात्र न्यायासाठी भटकंती करत आहोत, अशी माहिती बहिण उज्वला यांनी दिली.

प्रकरणाचा तपास सुरु –

या संपूर्ण प्रकरणात वडिलांच्या संपत्तीवर कब्जा करणे, त्यांना घराबाहेर काढणे आणि बहिणींवर हल्ले करून खोट्या तक्रारींचा खेळ खेळला जात आहे, असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. विशेष म्हणजे मुलगी उज्वला गेल्या चार वर्षांपासून स्वतःचा संसार सोडून वडिलांची सेवा करत आहे. पीडित बहिणींनी आता महिला आयोगाने यात लक्ष घालावे आणि आरोपी भावावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आई-वडिलांचा सांभाळ करणे हे कायद्याने बंधनकारक असताना आटपाडीत या कायद्याची पायमल्ली झाली आहे, असेही पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles