एका विद्यार्थ्याचा हात धरला अन् भविष्य उजळविण्याचा संकल्प केला! ; ‘दत्तक विद्यार्थी उपक्रम’ ठरला शिक्षण, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी सोहळा!

वेंगुर्ला : “एखाद्या विद्यार्थ्याला केवळ शालेय साहित्य देणे म्हणजे मदत नव्हे, तर त्याच्या स्वप्नांना बळ देणे, आत्मविश्वासाला पंख देणे आणि राष्ट्राच्या भविष्यात गुंतवणूक करणे होय,” या विचाराची प्रचिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा वेंगुर्ला यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘दत्तक विद्यार्थी उपक्रम – वर्ष पाचवे’ या प्रेरणादायी कार्यक्रमातून आली.

शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉल येथे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा केवळ शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम न ठरता, समाजातील प्रत्येक घटकाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा संदेश देणारा सामाजिक उत्सव ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव होते, तर उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य शिक्षक नेते उदय शिंदे, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, विद्यमान सभापती शंकर घारे, पंचायत समिती सदस्या साक्षी नार्वेकरशीतल राऊत, राज्य प्रतिनिधी दादा जांभवडेकर, सचिन मदने, प्रशांत मडगावकर, संतोष परब, राजू वजराटकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सचिव तुषार आरोसकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर, पतपेढी जिल्हाध्यक्ष सिताराम लांबर, संचालिका ऋतुजा जंगले, शिक्षण विस्तार अधिकारी कोथमिरे तसेच शिक्षण, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक संघटनेतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल असे शालेय शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक, दहावी-बारावीमध्ये यश संपादन केलेल्या शिक्षक समिती सदस्यांच्या पाल्यांचा, निवृत्त शिक्षकांचा तसेच नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थी आकस्मिक निधी उपक्रमालाही उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “शिक्षण हा खर्च नसून समाजाच्या विकासासाठी केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे. प्रत्येक सक्षम व्यक्तीने एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली, तर कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

कार्यक्रमभर शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांचे सुयोग्य नियोजन, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाविषयीची तळमळ प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांच्या डोळ्यांतील समाधान आणि उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम सर्वांच्या मनाला स्पर्श करून गेला.

“ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान आणि विद्यार्थ्यांमध्ये केलेली गुंतवणूक हीच राष्ट्रनिर्मितीची खरी पायाभरणी आहे,” हा संदेश देत संपन्न झालेला ‘दत्तक विद्यार्थी उपक्रम’ वेंगुर्ला तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव रामा पोळजी यांनी केले. सूत्रसंचालन ऋतिका राऊळ यांनी केले, तर राजू वजराटकर यांनी आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles