कणकवली : “जन्मताच आपल्याला तीन गुरु मिळतात. डोळे, नाक आणि कान या मुख्य दिन तीन ज्ञानेन्द्रियांच्या साह्याने अध्यापनाचा प्रारंभ होतो. त्यातून आपण खूप काही शिकतो. त्यानंतरचे महत्त्वाचे दैवत आई-वडील असतात. पुढे शाळेत गेल्यानंतर शिक्षक आपल्या जीवनाला आकार देतात. आपले वैयक्तिक आयुष्य घडविण्यात आणि समाज घडविण्यात सुद्धा शिक्षकांचे मोठे योगदान असते’ असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे यांनी केले.
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त अभिवादन ,आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत शिक्षक, कर्मचारी सन्मान सोहळ्यात श्री दत्तात्रय तवटे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय तवटे उपस्थित होते. तर मंचावर प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. डॉ. सोमनाथ कदम, प्रा. महादेव माने, कार्यालय अधीक्षक संजय ठाकूर, प्रा. पी. जे. लोकरे, अभिरूप प्राचार्य भूषण सावंत, अभिरुप उपप्राचार्य जयेंद्र डोंगरे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना दत्तात्रय तवटे यांनी लहानपणातील अनुभव कथन केले. नागवे ते कणकवली असा कष्टप्रद शिक्षणाचा प्रवास उलगडून दाखवला. आणि ‘शिक्षणानेच आपली प्रगती होते’ हे अधोरेखित केले.
यावेळी प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “शिक्षक हा सामाजिक अभियंता असतो. समाजाबरोबर राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. पिढी घडवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या जगण्यातून आणि वागण्यातून आदर्श प्रस्थापित केले पाहिजेत.”असे मत प्रा. युवराज महालिंगे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कणकवली महाविद्यालयातील अध्यापन, मूल्यमापन व प्रशासनाचे संपूर्ण कामकाज तृतीय वर्षाच्या सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे पार पाडले. यावेळी कला, वाणिज्य, विज्ञान ,संगणक शास्त्र ,बॅफ या विद्या शाखेतील प्रत्येकी एक विद्यार्थ्यांचा शिक्षक दिनी उत्कृष्ट अध्यापन केल्याबद्दल आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून कणकवली महाविद्यालयातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापक व कर्मचारी सर्वश्री प्रा.युवराज महालिंगे, डॉ.सोमनाथ कदम, डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. बाळकृष्ण गावडे, डॉ.बी.एल. राठोड, प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा.सुरेश हुसे, प्रा. नूतन घाडीगावकर, प्रा. एस. आर. जाधव, प्रा.साहिल माणगावकर, प्रा.अदिती मालपेकर, श्री भूषण राणे,श्री सिद्धेश पेडणेकर व श्री सागर वणस्कर यांचा
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय तवटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, ग्रंथपाल ,सहाय्यक ग्रंथपाल, लिपिक, परिचर ,शिपाई अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडून उत्कृष्टरित्या महाविद्यालयाचे अध्यापनाचे कार्य पूर्ण केले.शंभर विद्यार्थ्यांनी प्राध्यापक म्हणून अध्यापन केले.
सर्वप्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण व क्रांतीज्योती, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोमनाथ कदम यांनी केले. सूत्रसंचालन नीरज राठोड.यांनी केले व शेवटी आभार बुशरा बागवान यांनी मानले.
ADVT –