सावंतवाडी: टीईटी व जुनी पेन्शन प्रश्नी जंतरमंतरवर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षकसंघाचे २४ नोव्हेंबर रोजी भारताची राजधानी दिल्ली येथील जंतर मंतर येथे धरणे आंदोलन होत असून अखिल प्राथमिक शिक्षक संघाची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे टीम सदर आंदोलनासाठी आज रवाना झाली.
सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर २०२५ रोजी टिईटी अनिवार्यते संबधी दिलेला निर्णय समस्त शिक्षकांना व्यथित करणारा तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या अनुभव सिध्द कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा व शिक्षक संवर्गाचे अस्तित्व मिटवणारा आहे. या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने २५ सप्टेंबर रोजी शिक्षक संघटनेच्या वतीने पहिली पुनर्विचार याचिका दाखल केली असून वेगवेगळ्या पाच याचिका संघटना दाखल करत आहे .या संबधी कायदे तज्ञांचा सल्ला संघटना घेत आहे.विविध राज्यांनीही याचिका दाखल केल्या असून देशभरातील समस्त शिक्षक वर्ग न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र असे जरी असले तरी न्यायालयीन लढाई बरोबरच आंदोलनाचा मार्ग अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने अवलंबला आहे .कारण ही लढाई दिसते तेवढी सोपी नाही.
मा.पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री तसेच प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री यांना संघटनेच्या वतीने शासनाने हस्तक्षेप करावा यासाठी प्रत्येक राज्यातून एकाच वेळी निवेदन दिले. लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेवून येणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नी आवाज उठवावा अशी विनंती करण्यात येत आहे.त्याचबरोबर देशभरातील लाखो शिक्षकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे.आता २४ नोव्हेंबर रोजी देशभरातील शिक्षक प्रातिनिधिक लक्षवेधी धरणे आंदोलन देशाची राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक जंतरमंतर वर करणार आहेत. या आंदोलनाचा आपण भाग होऊन या आंदोलनात सहभाग नोंदवा, अशी विनंती संघातर्फे करण्यात आली आहे.
दरम्यान अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे नेते माजी केंद्रप्रमुख महादेव देसाई यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे टीम आज नवी दिल्ली येथे होणाऱ्या या आंदोलनासाठी रवाना झाली आहे.


