मुंबई : राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अनेक नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. उद्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून चिन्हांचे वाटपही होणार आहे. त्यानंतर जोमाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. असं असतानाच आज नवी मुंबईत भाजपकडून मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. याच कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शरद पवारांच्या पक्षाला ऐन निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.
अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश –
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर या पक्ष प्रवेशकगी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, आदरणीय मोदीजी व आदरणीय देवेंद्रजींच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन नवी मुंबई परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. यात राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट) लीलाताई वाघमारे, कुंदा वाघमारे, जसप्रीत कौर, अर्चना पवार, मनिष तांबे, अमित शिंदे, युवा सेना प्रमुख डॉ. चेतना शिंदे, विभागप्रमुख धनराज सोनावणे, विभागप्रमुख सचिन कळमकर, उपविभागप्रमुख काशिनाथ भोईटे, शाखाप्रमुख बाळू शिंदे, उपशाखाप्रमुख चंद्रकांत लोहाटे, महिला आघाडी प्रमुख शीतल शिंदे, काँग्रेस समन्वयक दिलीप देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश आहे. आजच्या पक्ष प्रवेशाने नवी मुंबईतील भाजपा परिवाराचे संघटन आणखी मजबूत झाले आहे. सर्वांचे स्वागत आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !



