वेंगुर्ला : होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून, ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे जोरदार आवाहन ठाकरे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी राजाराम उर्फ आबा चिपकर यांनी केले आहे.
ठाकरे गटाने या निवडणुकीसाठी दिलेले सर्व उमेदवार हे सुशिक्षित, अनुभवी, प्रामाणिक आणि तळागाळातील जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे असून, सामान्य माणसाच्या दुःख–वेदना समजून घेणारे नेतृत्व या माध्यमातून उभे केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वेंगुर्ला तालुक्याचा सर्वांगीण विकास, शेतकरी, मजूर, महिला, युवक, विद्यार्थी तसेच दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सक्षम व कर्तबगार उमेदवारांचीच गरज आहे. हीच गरज ओळखून ठाकरे गटाने लोकांच्या विश्वासास पात्र ठरणारे उमेदवार जनतेसमोर मांडले आहेत, असेही श्री. चिपकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना श्री. राजाराम उर्फ आबा चिपकर म्हणाले,
“वेंगुर्ला तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व मजबूत करणे आज अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सर्व मायबाप मतदार बंधू-भगिनींना नम्र पण ठाम आवाहन आहे की, पक्षातर्फे देण्यात आलेल्या आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या, आम्ही तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.”



