पालकमंत्री नितेश राणे यांची बातच न्यारी!, कोकणातील आंबा बागायतदारांना देणार उभारी! ; आंबा उत्पादनांवरील नैसर्गिक आपत्तीचा सकारात्‍क अहवाल शासनाकडे सादर करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश. ; कोकणातील आंबा बागायतदारांना शासन मोठ्या प्रमाणात मदत करेल.

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकास नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला पाऊस असल्याने त्यास मोहर येण्यास उशीर झाला. त्यानंतर डिसेंबर पासून जिल्ह्यात असणारे सातत्याने कमी तापमान व थंड वातावरणामुळे त्यावर चांगला मोहोर आलेला दिसून आला. त्याचप्रमाणे आता तिसरा मोहोर आल्यानंतर त्यातून किती उत्पन्न आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल, याचा भरवसा नाही. त्यामुळे कृषी विभागाने योग्य अहवाल तयार करून तो शासनाकडे तात्काळ सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्यावर आलेल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू संजय भावे, फलोत्पादन संचालक अंकुश माने, डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे संशोधन संचालक डॉ.वी.यु.शहारे, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ विभागाच्या विभागप्रमुख डॉ.पुष्पा पाटील, किटकशास्त्रचे विभागप्रमुख डॉ.विजय देसाई, कृषी विभागाचे अवर सचिव ललितकुमार धायगुडे तसेच आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, आंबा बागायदार व व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोकणातील आंबा पिकांवर मोहोर आला नसल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर, पुढील काळात जर पाऊस आला किंवा उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली तर आंबा उत्पादकांच्या हाती काहीही पडणार नाही. त्यामुळे आंबा उत्पादकांना ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून कोकणातील आंबा बागायतदारांना शासन मोठ्या प्रमाणात मदत करेल, असा विश्वास त्यांना आंबा बागायतदारांना दिला.

दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति आंबा झाड ५ हजार रुपये, यानुसार हेक्टरी सुमारे ५ लाख रुपये इतकी मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच सध्याची पीक कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांवरून ६ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सूचना ऐकून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आदेश संबंधितांना दिले.

कोकणातील आंबा उत्पादकांचे असे नुकसान आजपर्यंत कधीही झाले नाही तसेच कोकणातील शेतकरी कधी आक्रमक झाला नाही असे सांगून पालकमंत्री राणे यांनी कोकणातील आंबा उत्पादकांना शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे आंबा पिकांवर वेगवेगळी किटकनाशके फवारणी केल्याने उत्पादनात घट होते. यासाठी धोरण ठरविण्याचीही गरज पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केली. कोकणातील कृषी विद्यापीठे सक्षम करण्यावर अधिक भर देण्यात येण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कोकणातील आंब्यांच्या उत्पादनात अधिक प्रमाणात वाढावे यासाठीही परदेशी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखविली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलआंबा बागायतदार संदेश निकम, जनार्दन पडवळ, विलास ठाकूर, जयप्रकाश चमणकर, नितीन मांजरेकर, ज्ञानेश्वर केळजी, महेश गोखले, दत्तात्रय बलवान सर, विद्याधर जोशी, संतोष पडेलकर यांसह अन्य उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles