सावंतवाडी: भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अटल प्रतिष्ठानच्या सावंतवाडी येथील प्रशासकीय कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
१४एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावात बाबासाहेबांचा जन्म झाला.ज्याला नंतर आंबेडकर नगर असे नाव देण्यात आले.
ज्या काळात दलित जनता सवर्णाकडून होणारा अत्याचार सहन करत होती,अस्पृश्यतेचे चटके खात होती त्या काळात बाबासाहेबांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ व ब्रिटन मधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक येथे अर्थशास्त्र व राज्यशास्त्रात डॉक्टरेट मिळवली.त्या काळात डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले भारतीय होते.
फार मोठ्या परिश्रमातून आणि कष्टातून त्यानी संपूर्ण जगातील सर्वात मोठी व सर्वसमावेशक अशी भारतीय राज्यघटना तयार केली ज्या घटनेबाबत आजचे राजकारणी उलट सुलट चर्चा करून आपले अज्ञान प्रकट करत आहेत.
देशातील गोरगरीब दलित जनतेच्या शोषणाविरुध्द बाबासाहेबांनी एल्गार पुकारला आणि दलितांना “शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा” असा मंञ दिला. दुर्दैवाने आजच्या दलित नेत्यांनी बाबासाहेबांच्या या उपदेशाला हरताळ फासून वैयक्तिक स्वार्थासाठी सत्तेचे गुलाम होण्याचे धोरण स्वीकारल्याने बाबासाहेबांच्या विचारांपासून फारकत घेतली.दलित,शोषित वर्गाच्या उत्थानासाठी आपले सारे आयुष्य पणाला लावणाऱ्या बाबासाहेबांना सर्व उपस्थितांनी स्मरण करून अभिवादन केले.
यावेळी अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.नकुल पार्सेकर, सहकार्यवाह अँड. सौ. अनुराधा परब, विश्वस्त श्री बाळकृष्ण लिंगवत, माजी सैनिक श्री महादेव लिंगवत,अटल प्रतिष्ठानचे कायम निमंत्रित सदस्य श्री राजाराम पार्सेकर, कार्यालयीन व्यवस्थापिका कु.ज्योती राऊळ आदी उपस्थित होते.



