सावंतवाडी : काही माणसं सर्वसामान्य माणसाच्या असणाऱ्या चौकटीत बसणारी नसतात . त्यांचं जीवनच इतरांपेक्षा वेगळं असतं. बबनचं जीवनही असंच आगळ वेगळं होतं. नोकरी, लग्न आणि चार भिंतीतील संसार त्याला मान्य नव्हता. म्हणूनच त्याने ‘नोकरी आणि छोकरी’ या बंधनात अडकून न राहता ‘हॉटेलमें खाना और हॉटेलमे ही रहना.!’ हे जीवनाचं सूत्र निर्माण केलं आणि मुंबईच्या मायाजाळ दुनियेत सुमारे 25 /30 वर्ष स्वतःचं घर, जवळची माणसे नसतानाही मंत्रालयातील ‘आमदार निवास’ हेचं आपलं वस्तीस्थान बनवून, जणू सिंधुदुर्गचा मंत्रालयातील ‘ॲम्बेसिडर’ (दूत) म्हणून गेली अनेक वर्ष त्यांनी मनापासून प्रामाणिक भूमिका पार पाडली. त्यामुळे अनेक कामं जिल्ह्यातील मार्गे लागायची. त्यामुळेच सिंधुदुर्गवासियांना मुंबईच्या मंत्रालयातील ‘आपला हक्काचा माणूस’ म्हणून बबनची ओळख होती.
बबन हा दिलदार मित्र गमावल्याचे दुःख आज अनेकांना झालं आहे.
बबन गवस आणि माझा परिचय सुमारे 1982 – 83 पासूनचा म्हणजेच सुमारे 40 वर्षांपूर्वीचा. दैनिक ‘तरुण भारत’च्या सुरुवातीस बबन तरुण भारतचा प्रतिनिधी होता. तरुण भारतच्या सुरुवातीच्या काळात त्यावेळी बबनची भूमिका अत्यंत महत्त्वाचे होती. त्यावेळी बबन जिल्ह्यातील एक आघाडीचा युवा कार्यकर्ता. रक्तदान, क्रीडा, सामाजिक अशा क्षेत्रात कै. बाळ बांदेकर आणि त्यांच्या मित्र परिवारातून पुढे आलेला लोकप्रिय युवा कार्यकर्ता लाघवी वकृत्व आणि माणसे जोडण्याची शैली त्यामुळे बबनची लोकप्रियता अधोरेखित होती. बबन कुठेही असो रस्त्यात असो अथवा प्रवासात असो बबनची कुठे ओळख नाही, असे क्षण फार दुर्मिळ असे. मात्र मोठमोठ्या ओळखी असूनही त्याने आपले सुरक्षित करिअर घडवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. मात्र सुरुवातीच्या काळात तरुण भारतच्या माध्यमातून त्यांनी नोकरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे स्थिर न राहता त्यातून बबन बाहेर पडला. दरम्यानच्या काळात पुन्हा गोमंतकतमध्येही काही वेळ असाच नोकरीचा प्रयत्न केला, पण तिथेही त्यांनी स्थिर न राहता आपला वेळ स्वतंत्र जीवनशैलीत घालवण्याचा निर्णय घेतला.
बबनचं बोलणं अत्यंत मधुर असायचं. वागण्यातही नम्रता असायची. त्याच्या बोलण्यातून अधिकाऱ्यांच्यावर छाप बसायची. त्यामुळे बबन ज्या ऑफिसमध्ये जायी, ते ऑफिसमधील अधिकाऱ्यांशी लगेच त्याची मैत्री व्हायची. या मैत्रीचा फायदा अनेकांना व्हायचा. आणि त्यामुळे बबनचा जनसंपर्क वाढल्याने त्याने येथून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
मुंबईत गेल्यानंतर त्याने आपले वस्तिस्थान आमदार निवास आणि मंत्रालय येथे केलं. जिल्ह्यातील कोणाचेही गोरगरीबांचं काम असेल की बबन पुढे असायचा. ते काम करून घेण्यास तो वाकबगार होता. गेले अनेक वर्षे मंत्रालयातचं असल्याने कुठचा ऑफिस बबनला माहित नाही आणि बबनचा तेथे संपर्क नाही, असं होत नसे. त्यामुळे मंत्रालयातील प्रत्येक कामाविषयी खडान् खडा त्यांना माहिती होती. शिवाय शासनाचे जीआर, त्यांचे अर्थ त्यातून कामं कुठून केली जातात?, यात तो अत्यंत वा पटाईत आणि माहितगार होता. कामाच्या बदल्यात एखाद्या अधिकाऱ्यांना कसं खुश करायचं?, हे बबनला माहित असायचं. त्यामुळे बबन वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून या जिल्ह्यातील लोकांचे कामे करत असायचा.
मला आठवतं, एका कामासाठी मी आणि बबन मुंबईला गेलो होतो. ही तारीख होती 21 मे 1987 त्यावेळी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कै. नकुल पाटील हे होते. आम्ही त्यांची वरळी फेस बंगल्यावर भेट घेतली. संध्याकाळी कै. वाय. डी. सावंत आणि आबा तोरसकर यांच्यासह हॉटेल Sentor मध्ये पत्रकार परिषद पार पडली आणि पुन्हा संध्याकाळी सात वाजता तत्कालीन मुख्यमंत्री नामदार शरद पवार यांची जिल्ह्याच्या पाणी समस्येवर भेट घेतली. या सर्व भेटी केवळ बबनच्या संपर्कातूनच घडत होत्या याचे मला एकदम अप्रूप वाटायचं. पण त्यानंतर मात्र माझी नोकरी, लग्न, संसार आणि कौटुंबिक कारणामुळे बबनचा संपर्क थोडा कमी झाला. मात्र मैत्री आमची कायम असायची. बबन अधूनमधून मुंबईतून विचारपूस करायचा. एखाद्या पेपरात आलेले बातमीचे कात्रण मुंबईतून मला पाठवायचा आणि नेहमी मैत्री टिकविण्याचे कामही करायचा. मी सेवानिवृत्त झाल्याचे वृत्त त्याला समजल्यानंतर मुंबईत येण्याचं त्याने निमंत्रण दिलं. पण दुर्दैवाने त्याच दरम्यान तो एका दुर्धर आजाराचा शिकार झाला.
मात्र तरीही आपल्या आजाराचा गांभीर्यानं विचार न करता किंवा इतरांना ते कळू नये, याचीच त्यांनं दक्षता घेतली. या अवस्थेतही सतत संपर्क, लोकांच्या कामात व्यस्त राहिला. आपल्या आजाराचा बागुलबुवा न करता जनतेच्या कामात व्यस्त राहिला आणि आजाराकडेही थोडं दुर्लक्ष केलं. शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडूनही शेवटी अघटित घडलं. आणि आमचा जिवलग मित्र काळाच्या पडद्याआड गेला. कुटुंबाने अतोनात प्रयत्न केले मात्र ते सर्व व्यर्थ ठरले.
बबनच्या ‘त्या’ दुर्धर आजाराची बातमी कळल्यानंतर त्याची भेट घेतली. खूप दिवसांनी खूप गप्पा केल्या आणि पुन्हा या आजारातून बाहेर पडल्यानंतर मुंबईला येण्याचा त्याने मला आग्रहाचं निमंत्रणनही दिलं. मीही ते स्वीकारलं. पण दुर्दैवानं त्यानंतर त्याचा आजार बळावला
आणि त्याच्यात त्बबन आमच्यातून कायमचा निघून गेला. आमची भेट दुर्दैवाने अपुरीचं राहिली.
आयुष्यभर जनतेची कामं करण्याचे व्रत घेतलेला, दुसऱ्यांसाठी सतत मदतीला धावून जाणारा, परोपकारी आणि अजातशत्रू असलेला, आमचा दिलदार आणि जिंदादिल बबन अशी अचानक, एवढ्या लवकर अकाली एक्झिट घेईल?, असं कधी वाटलंच नव्हतं. पण दुर्दैवानं ते घडलंय.!
मित्रा बबन तुला हृदयापासून भावपूर्ण श्रद्धांजली..!
– तुझा मित्र –
मोहन जाधव.