साबाजी परब.
– वेंगुर्ल्यात गुणवंत विद्यार्थी, मुख्याध्यापक व प्राचार्यांचा सन्मान; विशाल परब यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, शिक्षण क्षेत्राला भक्कम पाठबळ
वेंगुर्ला : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देत शिक्षण क्षेत्राला सातत्याने बळ देणारे भाजप महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला येथे दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. विशाल परब यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

कोकण शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि तुळस विशाल परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात बोलताना विशाल परब यांनी “शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, त्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्य जोपासावे. आजचा गुणवंत विद्यार्थीच उद्याचा सक्षम नागरिक आणि देशाचा भविष्याचा शिल्पकार आहे,” असा प्रेरणादायी संदेश दिला.
या सोहळ्यास खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य गोस्वामी सर, कोकण शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळेकर, सचिव विवेक तीरोडकर, समीर कुडाळकर, नगरसेवक सचिन शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र परब, युवराज जाधव, कु. रिया केरकर, कु. गौरी माईनकर तसेच रवी शिरसाट यांची विशेष उपस्थिती लाभली.
याशिवाय विविध महाविद्यालयांचे उपाध्यक्ष, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानच नव्हे, तर त्यांच्या यशामागील शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या योगदानालाही मानाचा मुजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्याचे काम या सोहळ्यातून करण्यात आले.
शिक्षण, समाजकारण आणि युवा सक्षमीकरण या त्रिसूत्रीवर सातत्याने कार्यरत असलेले विशाल परब यांच्या उपस्थितीमुळे हा सत्कार सोहळा केवळ गौरवाचा कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



