पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळेच ८६ कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात!, आंबा व काजू बागायतदारांना मोठा आर्थिक दिलासा! ; जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती, तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ!

– दिरंगाई होणारी विमा रक्कम यंदा जुलै महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात.

– खासदार नारायण राणे यांचेही मानले आभार!

कणकवली : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सन 2025-26 च्या आंबा व काजू फळपीक विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 35 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 86 कोटींच्या आंबा-काजू विमा भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांनी सातत्याने राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. व हे नुकसानीची रक्कम प्राप्त करून घेतली. त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे शेतकरी जनतेच्या वतीने आपण त्यांचे आभार मानतो अशा शब्दात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी ऋण व्यक्त केले.
दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात मिळणारी विमा रक्कम यंदा जुलै महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून, याचे श्रेय पालकमंत्री नितेश राणे यांचे आहे.असे सिंधुदूर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.

कणकवली येथील खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत बोलत होते.

सतीश सावंत म्हणाले , 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आंबा व काजू फळपीक विमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांना 1 डिसेंबर 2025 ते 15 मे 2026 या कालावधीत झालेल्या प्रतिकूल हवामानाच्या आधारे विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना या भरपाईसाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र यंदा पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी मे महिन्यात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर सातत्याने आढावा घेतल्यामुळेच ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली, असे सतीश सावंत यांनी सांगितले.

यावर्षी अनेक मंडलमध्ये पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी सुमारे 75 हजार ते 95 हजार रुपयांपर्यंत विमा भरपाई मिळत आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. राज्यात फळपीक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू होताच सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातच भरपाई वितरित होण्यास सुरुवात झाली असून पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र काही मंडलमध्ये सदोष हवामान केंद्रांमुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप विमा भरपाई मिळालेली नाही. अशा सर्व प्रकरणांचा पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, विमा कंपनी, प्रशासन आणि बाधित शेतकरी यांची संयुक्त बैठक पुन्हा आयोजित करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात अधिक हवामान केंद्रे उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, भविष्यात अशा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी शेतकऱ्यांना आवाहन करताना सतीश सावंत म्हणाले, 15 जुलैपासून आंबा, काजू व भात पिकांसाठी ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. सर्व शेतकऱ्यांनी 31 जुलै पूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करावी. ई-पीक पाहणी पूर्ण झाल्यास पीक विमा तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळविणे सुलभ होईल. गेल्या वर्षी ई-पीक पाहणी न केल्यामुळे अनेक भात उत्पादक शेतकरी विविध लाभांपासून वंचित राहिले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

तसेच विमा रकमेबाबत अथवा अन्य कोणतीही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करत केंद्र व राज्य शासन तसेच खास. नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सतीश सावंत यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles