सामान्य ज्ञान – पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापाचा धोका वाढतो, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळात कमी आणि बाहेर जास्त फिरत असतात. तसेच हा काळ म्हणजे अनेक विषारी सापांच्या प्रजनानाचा काळ देखील असतो, त्यामुळे या काळात साप अधिक आक्रमक होतात. साप निवाऱ्यासाठी नेहमी जिथे जास्त आद्रता आहे आणि अंधार आहे, अशी जागा शोधत असतात, त्यांना जर अशी जागा तुमच्या घरात सापडली तर ते थेट तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा तुमच्या गार्डनमध्ये किंवा सोसायटीमध्ये साप दिसून येतात, याचं कारण हेच आहे की, या काळात साप सुरक्षीत निवाऱ्याच्या शोधात असतात.
आपल्याकडे सापांबद्दल अनेक गैर समज आहे. त्यातील सर्वात मोठा गैर समज हा असतो, की प्रत्येक साप हा विषारी असतो, परंतु तसं काहीही नसतं. त्यामुळे तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला मारू नका, किंवा पकडण्याचा प्रयत्न देखील करू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना पकडून सुरक्षित स्थळी मुक्त करतील. सतर्कता हाच सापांपासून वाचण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे, म्हणजे जंगलात फिरत असताना किंवा शक्यतो पावसाळ्यात कुठेही जाताना पायामध्ये बूटच घालावेत, तसेच जिथे फार गवत वाढलेलं आहे, अशा जागी शक्यतो जाणं टाळावं. परंतु अशा देखील काही वनस्पती आहे, ज्या सापांपासून वाचण्यास तुमची मदत करतात. या वनस्पतीच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप तुमच्या आसपास देखील येत नाहीत. त्यातीलच एक वनस्पती आहे, ती म्हणजे मोहाचं झाड, आदिवासी संस्कृतीमध्ये मोहाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. कारण मोहाचं झाडं हे आदिवासी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. मोहाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं. मोहाच्या फुलांपासून दारू बनवली जाते, तसेच त्याचे विविध भाग विकले जात असल्यामुळे या वृक्षाचा आदिवासी लोकांना मोठा आर्थिक आधार असतो. या वृक्षाच्या सालीमध्ये असे काही विशिष्ट गुणधर्म असतात, ज्यामुळे साप या वृक्षाच्या सालीपासून दूर राहतो. त्यामुळे जंगलात फिरत असातना सापांपासून बचावासाठी आदिवासी लोक या वृक्षाची साल आपल्या खिशातच ठेवतात.



