सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली क्रमांक २ येथे इन्सुली केंद्राची तिसरी शिक्षण परिषद नुकतीच उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात पार पडली. शिक्षकांच्या ज्ञानाची देवाणघेवाण, शैक्षणिक अडचणींवर चिंतन, नाविन्यपूर्ण उपक्रमांची चर्चा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रभावी नियोजन अशा विविधांगी उपक्रमांनी या परिषदेचे स्वरूप अधिक समृद्ध झाले.
परिषदेचा शुभारंभ विद्यादेवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नेहा सावंत यांनी केंद्रप्रमुख श्री. ठाकूर यांच्यासह उपस्थित सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले.

परिषदेच्या पहिल्या सत्रात केंद्रप्रमुख श्री. ठाकूर सर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडविणाऱ्या इन्सुली क्रमांक १, ३, ४ व ५ या शाळांतील शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांचे योगदान अधोरेखित करत त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

यानंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार मागील महिन्यातील अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, शैक्षणिक अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच विविध शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या उत्कृष्ट उपक्रमांवर शिक्षकांमध्ये सखोल चर्चा झाली. अनुभवांची देवाणघेवाण आणि परस्परांकडून शिकण्याची संधी यामुळे परिषदेला विशेष शैक्षणिक महत्त्व प्राप्त झाले.
नवोपक्रमापासून इंग्रजी अध्यापनापर्यंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन –
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात विविध शैक्षणिक विषयांवर तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सौ. राधिका परब यांनी नवोपक्रमाची गरज, त्याचे महत्त्व आणि वर्गातील प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सौ. धनदा शिंदे यांनी विद्यार्थ्यांचा पोर्टफोलिओ प्रभावीपणे कसा तयार करावा व तो सातत्याने अद्ययावत कसा ठेवावा, याविषयी मार्गदर्शन केले.

तर श्री. महेश सावंत यांनी इंग्रजी विषय विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपा, रंजक आणि आनंददायी करण्यासाठी विविध कृती, उपक्रम व अध्यापन पद्धतींची माहिती दिली.
गटकार्याद्वारे मासिक नियोजनाची प्रभावी निर्मिती –
शिक्षण परिषदेत केंद्रातील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गटवार कार्य केले. इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वी साठी ‘कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण (क.का.शा.)’ या विषयांचे सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचे मासिक नियोजन शिक्षकांनी एकत्रितपणे तयार केले. तयार करण्यात आलेल्या नियोजनाचे प्रभावी सादरीकरणही करण्यात आले.
दरम्यान, केंद्रप्रमुख श्री. ठाकूर सर यांनी शिक्षकांना आवश्यक प्रशासकीय बाबींबाबत सविस्तर माहिती देत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच प्रशासकीय कामकाजातही शिस्त, नियोजन आणि सातत्य राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. रुपाली गवस यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभारही त्यांनी मानले. इन्सुली केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने शिक्षण परिषद उत्साहात आणि यशस्वी वातावरणात संपन्न झाली.
ज्ञानाची देवाणघेवाण, अनुभवांचे मंथन आणि कृतीशील नियोजनातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देण्याचा संदेश देणारी ही शिक्षण परिषद शिक्षकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली.



