कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर रामा कदम (रा. पोखरण) यांचे आज पहाटे १ वाजून ४५ मिनिटांनी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. भजन क्षेत्रात आपल्या सुरेल आवाजाने आणि भक्तिमय गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे बुवा समीर कदम यांच्या अकाली निधनाने भजनप्रेमींवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने भजन क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि परिचितांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.
बुवा समीर कदम यांनी अलीकडेच गायलेले ‘काय चुकले स्वामी राया, हात द्यावा सावराया’ हे भजन सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून भजनप्रेमीना अश्रू अनावर होताना पाहायला मिळत आहे. आपल्या भावपूर्ण आवाजाने त्यांनी गायलेल्या या भजनाला रसिकांकडून मोठी पसंती मिळाली. त्यांच्या निधनानंतर हेच भजन त्यांच्या आठवणींना उजाळा देत असून, त्यांच्या चाहत्यांसाठी ते भावनिक ठरत आहे.
बुवा समीर रामा कदम यांची अंत्ययात्रा आज सकाळी ११ वाजता पोखरण येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.



