सावंतवाडी : कोकण आणि पत्रकार यांची परंपरा मोठी असून बाळशास्त्री जांभेकर यांच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याने अनेक पत्रकार दिले आहेत. या पत्रकारितेच्या परंपरेमध्ये आजगावचे सुपुत्र असलेले आणि तब्बल तीस वर्षे नवशक्ती सारख्या ख्यातनाम वृत्तपत्रात संपादक म्हणून कारकीर्द पूर्ण केलेले कै. पु. रा. बेहेरे यांची जन्मशताब्दी आजगाव येथे एप्रिल महिन्यात विविध कार्यक्रमाने मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करणार असल्याची माहिती मायक्रोसॉफ्टचे डायरेक्टर तथा बेहेरे यांचे सुपुत्र वासुदेव बेहेरे यांनी सावंतवाडी येथील नगरपरिषदेच्या पत्रकार कक्षात दिली.
प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार तथा बेहेरे यांचे स्नेही मोहन जाधव यांनी प्रस्ताविक करून वासुदेव बेहेरे यांची ओळख करून दिली तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांनी बेहेरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सुरुवातीला कै. पुरुषोत्तम रामचंद्र तथा पु .रा. बेहेरे यांचे शिक्षण, बालपण याबाबत माहिती देऊन स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1950 च्या दरम्यान कै. बेहेरे यांनी त्यावेळीच्या परिस्थितीनुसार मुंबई गाठली आणि सुरुवातीला आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. मात्र प्रभाकर पाध्ये यांच्या आग्रहास्तव त्यांनी नवशक्ती दैनिकामध्ये 1963 मध्ये वृत्त संपादक म्हणून कारकीर्द सुरू केली. तेथून कार्यकारी संपादक आणि त्यानंतर 1966 ते 1988 मुख्य संपादक अशी तब्बल तीन दशके त्यांनी या एकाच दैनिकात आपली कारकीर्द अधोरेखित केली. आपल्या सिद्धस्थ लेखणीची छाप टाकली. प्रत्यक्षात नवशक्तीतून ते 1988 मध्ये सेवानिवृत्त झाले असले तरीही त्यांनी आपले विविध स्तंभ लेखन संपादकीय वगळता विविध सदरे चालूच ठेवले चालूच ठेवली. त्यानुसार रविवारच्या पुरवणीत ,”ऐसी अशी अक्षरे रसिके ” हे आगळेवेगळे सदर त्यांनी सुरू केले, जे सदर खूपच लोकप्रिय ठरल. यातूनच अनेकांना त्यांनी लेखन करण्यास प्रवृत्त केले. शिवाय त्यांची ‘धक्के बुक्के’, ‘जन मनाचा कानोसा’, ‘कालप्रवाह’, ‘वाहते वा’रे, ‘सुभाषिते म्हणी’, ‘लोलक’, ‘मराठा गडी यशाचा धनी’ ही सदरही खूप लोकप्रिय ठरली.
संपादकाची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी विविध विषयावर विपुल लेखन केले. त्यामध्ये सुमारे 22 पुस्तकांचा समावेश आहे. यामध्ये धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय अशा पुस्तकांचा समावेश आहे. यामध्ये कोकणातील अनेक देव देवस्की आणि छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांची पुस्तके अतिशय लोकप्रिय ठरली. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ‘समय सूचकता’ आणि ‘तत्त्वनिष्ठता’ शिवाय ‘हजरजबाबीपणा’ असा त्यांचा लौकिक होता. मात्र स्पष्टपणा हा त्यांचा स्वभाव असूनही त्यांची मैत्री ही सर्व स्तरात समान होती. त्यामुळे बाळासाहेब देवरस असतील अथवा बाळासाहेब ठाकरे असो वसंतदादा पाटील असो की सध्याचे राजकीय नेते शरद पवार असो, त्यांची मैत्री सर्व पक्षात समान होती. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाची जन्मशताब्दी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल, शोभेल अशा व्यक्तींच्या उपस्थितीत साजरी केली जाणार आहे. त्यांची जन्मशताब्दी ही येत्या एप्रिलमध्ये त्यांच्या आजगाव या जन्मभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी केली जाणार असून जिल्ह्यातील मान्यवर आणि पु. रा. बेहरे प्रेमीनी सर्व वाचक, हितचिंतक आणि जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन वासुदेव बेहेरे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केले.