पुढील १५ दिवसांत जलजीवन योजनेचे काम चालू केले नाही तर ‘ह्या’ गावातील सर्व ग्रामस्थ करणार आंदोलन.!

संगमेश्वर : पुढील पंधरा दिवसांच्या आत जलजीवन योजनेचे काम चालू केले नाही तर येडगेवाडीतील सर्व ग्रामस्थ आंदोलन करण्यात येणार असून याबाबत निवेदन देण्यात आले आहे. कुटगिरी येडगेवाडी ग्रामस्थांच्यावतीने याबाबत निवेदन देण्यात आले असून या निवेदनात असे म्हटले आहे की, जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या कुटगिरी येडगेवाडी नळपाणी योजनेच्या मुळ अंदाजपत्रकात पाचांबे गायकवाडवाडी येथे विहीर बांधणे नियोजित होते. सदर ठिकाणापासून येडगेवाडी ४ ते ५ कि. मी. अंतरावर असुन सदर मार्ग खुप झाडी व डोंगराळ भाग असुन २० एच.पी. च्या पंपाला १००० मीटरचा हेड आहे.

भविष्यात आम्हा कुटगिरी येडगेवाडी ग्रामस्थांना प्रति महिना येणारे वीज बील व देखभाल खर्च परवडणार नाही. सदर ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याचे मत आम्हा येडगेवाडी ग्रामस्थांचे असुन त्याची कल्पना देखील तत्कालीन उपअभियंता श्री. लठाड यांना दिलेली आहे. आमदार शेखर निकम यांचे सदर पाचांबे गायकवाडवाडी येथे नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याचे पत्र देखील कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि. प. रत्नागिरी यांना दिलेले आहे. आमच्या वाडीची एकूण लोकसंख्या ६५० ते ७०० च्या आसपास असुन बहुतांश ग्रामस्थ हे पुणे, मुंबई येथे वास्तव्यास असल्याने वाडीतील बहुताश घरे बंद देखील असतात. आमच्या वाडीमध्ये ५ सार्वजनिक विहीरी असुन त्यांतही चांगला पाणीसाठा असतो.

कुटगिरी येडगेवाडी ग्रामस्थांनी दि. १५ मार्च २०२४ रोजी विहिरीचे स्थान स्थलांतरीत करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत राजिवली व गटविकास अधिकारी यांस, निवेदन देखील दिलेले आहे. त्या अनुषंगाने दि. ५-४-२०२४ रोजी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी
रत्नागिरी, गटविकास अधिकारी व श्री. लठाड येडगेवाडीत येवून पाहणी करुन निवेदनातील मागणीप्रमाणे तिवटी येथील खोदकाम चालु असलेल्या विहिरीतील पाणी साठा वाढवण्यासंदर्भात आडव्या बोर मारणे, रुंदीकरण करणे व अजुन १० ते १५ फुट खोदकाम करणे, अशा सुचना देवून, त्याच निवेदनातील मागणीप्रमाणे पायरी येथील पिण्यायोग्य पाणी नसलेल्या दुसऱ्या विहीरीतील पाण्याचा उपसा करुन, त्यातही विहीरीची पाणी पातळी तपासणी करण्याच्या सुचना देखील दिल्या होत्या.

येडगेवातील एकुण ९०च्या आसपास कुटूंबापैकी ७८ कुटूंबाच्या कुटूंब प्रमुखांची पर्यायाने ४९५ ग्रामस्थांची मागणी देखील, येडगेवाडीतीलच तिवटी व पायरी या ठिकाणातील दोन्ही विहीरींवरच नळपाणी पुरवठा योजना करुन दोन्ही विहीरीच्या वरच्या बाजूस आर.सी.सी. बंदारे बांधावेत अशी आहे. तशा प्रकारची ७८ कुटुंबाची पर्यार्याने ४९५ ग्रामस्थांची लेखी मागणीपत्र, ग्रुप ग्रामपंचायत राजिवली, गटविकास अधिकारी, देवरुख, आमदार श्री. शेखरजी निकम व आपल्या कार्यालयास दिलेली आहेत. शासनाने नवीन सुधारीत अंदाजपत्रकाप्रमाणे 15 दिवसाच्या आत जलजिवन योजनेचे काम चालू केले नाही तर येडगेवाडीतील सर्व ग्रामस्थ 26 जानेवारी 2025 ला आमरण उपोषणाला बसणार व पुढच्या होणाऱ्या सर्व गोष्टीना शासन जबाबदार असेल, असे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles