शिक्षक विद्यार्थी घडवतात.. आणि पुढची संस्कारक्षम पिढीही घडवतात… आता संस्कारक्षम पिढी, आदर्श शिक्षक हे शब्द वापरुन गुळगुळीत झालेले आहे. शिक्षकांच्या विचारांचे आणि आचरणाचे एवढे राजकीयकरण झालेले आहे की त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात. काही जे याला अपवाद आहेत त्या बिचाऱ्याना सुध्दा त्याच तराजूत ढकललं जात हे पण दुर्दैवी आहे. उपक्रमशील आणि संस्कारक्षम शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची आज मोठ्या प्रमाणात वानवा आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार हा तर दिवसेंदिवस चेष्टेचा विषय बनत चाललाय. बरबटलेले चेहरे जेव्हा अशा पुरस्काराने सन्मानित होतात आणि त्यांचा खरा चेहरा काही काळानंतर समोर येतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही मात्र काळ सोकावतो.सामाजिक जडणघडण जर योग्य दिशेने झाली पाहिजे यासाठी नैतिक अधिष्ठान मजबूत लागतं… हे सगळे विचार मांडण्याच कारण म्हणजे जुन्या पिढीतील, कडक शिस्तीचे बांदा नवभारत शिक्षण संस्थेतील आदर्श शिक्षक वराडकर सरांचे कालच निधन झाले. त्याना शासनाने पुरस्कार दिला की माहीत नाही.. पण ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील एक गौरव मूर्ती होते. आदर्श शिक्षक कसा असावा यांचे उत्तम उदाहरण म्हणजे वंदनीय वराडकर सर.
बांदा नवभारत शिक्षण संस्थे अंतर्गत ज्या नेहरू दिना निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या तेव्हा सातत्याने माझा पहिला नंबर असायचा तेव्हा सरांच्या शुभहस्ते माझा एक दोन वेळा झालेला सत्कार हा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मी भेडशीला इयत्ता दहावीत होतो तेव्हा बोर्डाच्या परिक्षेत मला बांद्याला याव लागल कारण परिक्षा केंद्र बांदा होत. त्या परिक्षेच्या वेळची गोष्ट मला आजही आठवते. सर अतिशय कडक त्यामुळे प्रत्येक हाॅलमध्ये ते फिरायचे. ज्या हाॅलमध्ये मी होतो तेव्हा पेपर लिहित असताना माझी मान दुखायला लागली म्हणून मागे पाहिलं तेव्हा सर जोरात ओरडले.. पुढे बघून पेपर लिही, नाहितर पेपर काढून घेईन.
हा एक अनुभव एका बाजूला नाहीतर एका शिक्षण संस्थेत संचालकांच्या मुलाला दहावीच्या परिक्षेत जाहिरपणे काॅपी पुरवणारे “आदर्श शिक्षक” दुसऱ्या बाजूला. ज्याने या जिल्ह्यात संस्थेतील नोकर भरतीचे रॅकेट चालवून बक्कळ पैसे कमावले. . काळ बदलला… माणसं बदलली.. नैतिकतेची जागा दुराचाराने घेतली.. तरीही वराडकर सरांसारखे शिक्षण क्षेत्रातील तपस्वी, आदर्श आणि संस्कार देणारे दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेल्याने समाजाचे फार मोठे नुकसान होते.. असे आदर्श शिक्षक परत होणे नाही… जसे साने गुरुजी एकदाच झाले… तसे सिंधुदुर्गात शैक्षणिक क्षेत्रात वराडकर सर. एकदाच झाले… आता परत होणे नाही.!
सरानां विनम्र अभिवादन…!
… ॲड. नकुल पार्सेकर,
सावंतवाडी.