मेलबर्न : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्वाच्या सामन्यात टीम इंडिया अडचणीत आली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात 474 धावांचा डोंगर रचला आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे. कारण भारताने ही धावसंख्या पार केली नाही किंवा फॉलोऑन टाळला नाही तर पराभव निश्चित आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणं जवळपास अनिश्चित होऊन जाईल. चौथ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांना खेळपट्टीचा अंदाज होता. ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभी राहणार हे दोन्ही संघांना माहिती होतं. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न होता. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीनंतर ही बाब अधोरेखित केली होती. पण भारताने नाणेफेक गमवल्याने वाटेला गोलंदाजी आली. तसेच खेळपट्टी आणि होम ग्राउंडचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. ऑस्ट्रेलियाने सर्वबाद धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी चांगला स्पेल टाकला. बुमराहने 4 आणि जडेजाने 3 गडी बाद केले. तर आकाशदीपला दोन गडी बाद करण्यात यश आलं. वॉशिंग्टन सुंदरने एक गडी बाद केला. मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी यांची झोळी रिती राहिली. दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून तीन जणांनी अर्धशतकी खेळी केली. सॅम कोनस्टासने 60, उस्मान ख्वाजाने 52, मार्नस लाबुशेनने 72 धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध या मालिकेत सलग दुसरं शतक ठोकलं. त्याने 197 चेंडूंचा सामना करत 140 धावा केल्या. तर कर्णधार पॅट कमिन्सचं अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकलं. त्याने 63 चेंडूत 49 धावा केल्या.