सावंतवाडी : प्रशासनावर कोणाचाही अंकुश नसून निकृष्ट दर्जाची काम तालुक्यात होत आहेत. आमदार दीपक केसरकर मतदारसंघात दिसत नाहीत. मंत्रीपद नसल्याने आता नाराज न होता पंधरा वर्षांत दिलेले शब्द त्यांनी पूर्ण करावे, अन्यथा आपण नाराज असून काम करू शकणार नाही हे जाहीर करावं, असं आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिलं. तसेच मंत्री नितेश राणेंनी पक्षाच्या सदस्य नोंदणीत लावलेल्या धडाक्याप्रमाणेच आंबा बागायतदारांचे फळ पिक विम्याचे रखडलेले पैसे आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं मत श्री. राऊळ यांनी व्यक्त केल. येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी श्री. राऊळ म्हणाले, सावंतवाडी तालुक्यात रस्त्यांची निकृष्ट दर्जाची काम होत आहे. ठेकेदारांकडून रस्त्यावर माती टाकली जात असल्याने अपघाताला आमंत्रण दिलं जातं आहे. प्रशासनावर कोणाचं अंकुश राहील नाही. निवडणूका झाल्या की दीपक केसरकर मतदारसंघात दिसत नाहीत, त्यांना शोधावं लागतं. नाराज होऊन कुठे बसलेत याचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे दीपक केसरकर यांनी निदान जाहीर करावं की ते नाराज आहे. त्यामुळे केसरकर यांनी आता नाराज न होता पंधरा वर्षांत दिलेले शब्द पूर्ण करावे. अन्यथा, आपण नाराज असून काम करू शकणार नाही हे तरी जाहीर करावं असं आव्हान, श्री. राऊळ यांनी दिले.
मंत्री नितेश राणे यांना पक्षान जबाबदारी दिली अन् ते जोरात कामाला लागले ही गोष्ट चांगली आहे. पण, मंत्री म्हणून पक्षाच्या सदस्य नोंदणीत लावलेल्या धडाक्याप्रमाणेच आंबा बागायतदारांचे फळ पिक विम्याचे रखडलेले पैसे आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. कोकणातील युवा मंत्री ते असून शेतकऱ्यांसाठी ते काही घेऊन आले असते तर अधिक चांगल वाटलं असत. जनतेच्या प्रश्नांसाठी अन् विकासासाठी आमची साथच त्यांना राहिलं. या माध्यमातून नितेश राणेंकडे रखडलेल्या विम्याची गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. उद्यापासून आंदोलन करतो असं म्हंटलेल नाही. सदस्य नोंदणी प्रमाणेच फळपिक विम्याचे पैसे मिळावे यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, राज्य सरकारचा हिस्सा जमा करुन ते पैसे शेतकऱ्यांना अदा करावे असे रूपेश राऊळ यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणूकांपूर्वी झालेल्या पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय श्रेष्ठींनी घेतला. पराभवानंतर आत्मपरीक्षण आम्ही केलं आहे. आमच्या बैठकाही झाल्यात. माजी खासदार विनायक राऊत बैठक घेणार असून नेतृत्व पुढील निर्णय घेईल. आयत्यावेळी उमेदवार येण हा रणनीतीचा भाग होता. पक्षश्रेष्ठींना ते योग्य वाटलं. आमच्यात याबाबत कोणतीही नाराजी नाही. मात्र, निवडणूकांपूर्वी किमान सहा महिने आधी पक्षप्रवेश घेतल्यास संघटना वाढीसह चांगलं यश संपादन करता येऊ शकत अशा भावना श्री. राऊळ यांनी व्यक्त केल्या. यावेळी उप तालुकाप्रमुख बाळू माळकर, निशांत तोरसकर, उप विभाग प्रमुख विनोद ठाकुर आदी उपस्थित होते.