कुडाळ : आध्यात्मिक अधिष्ठान हे आपल्याला नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन देत असतं. भजन, कीर्तन आदिच्या माध्यमातून कोकणात भक्तीचा जागर सुरु असतो. अशा आध्यात्मिक कार्याला राजघराणे नेहमीच पाठिंबा देत आलेलं असून यापुढील काळात या जिल्ह्यातील गावागावात असे प्रबोधनात्मक उपक्रम राबवले गेले पाहिजेत असे आवाहन युवराज लखमराजे यांनी आकेरी येथील श्री देव रामेश्वर मंदिरात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी काढले. आकेरी श्री देव रामेश्वर मंदीर व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आकेरी व ग्रामपंचायत हुमरस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर यांनी, बदलत्या सामाजिक परिस्थितीत गावागावात सलोख्याचे व सौहार्दाचे वातावरण टिकून रहाण्याची अशा उपक्रमांची आवश्यकता असून आकेरी, हुमरस सारखी छोटी गावं आजच्या या गतीमान आणि तांत्रिक युगात असे आध्यात्मिक उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवत आहेत हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले. अशा उपक्रमांना आपले सदैव सहकार्य असून गेल्यावर्षी हुमरस येथे पार पडलेल्या आरोग्य शिबिरात आपण सरपंच श्री सिताराम तेली यांच्या विनंतीवरून दीड लाख रुपयांचे मोफत चष्मे उपलब्ध करून दिले होते याचा लाभ दोनशेहून जास्त रुग्णाना झाला.
यावेळी आकेरीचे सरपंच महेश जामदार, हुमरसचे सरपंच सिताराम तेली, हुमरसचे उपसरपंच प्रवीण वारंग, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. राऊळ, श्री देव रामेश्वर मंदीर व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठीत गावकरी मंडळी, ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन निलेश तेली यांनी केले.