सावंतवाडी : येथील चिंतामणी साहित्य प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आरती’ मासिकच्या प्रमुख आयोजनाखाली कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त सहकार्याने दरवर्षी निमंत्रित कवयित्रींचे ‘विभागीय कवयित्री संमेलन’ संपन्न होत असते. यावर्षी निमंत्रितांचे अठरावे संमेलनआज श्री राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडीच्या सभागृहात सायंकाळी साडे चार वाजता आयोजित केले आहे.
या अठराव्या संमेलनाच्या अध्यक्षा मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिका हेमांगी नेरकर असून उद्घाटक म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय मंडळाच्या अध्यक्ष नमिता कीर यांची उपस्थिती लाभणार आहे. या संमेलनासाठी कोल्हापूरहून डॉ. ईला माटे, साखळी सत्तरी येथील प्रा. पौर्णिमा केरकर, पनवेल येथील अड. माधुरी थळकर, गोव्याहून राजनी रायकर, कविता आमोणकर या नामवंत कवयित्रींना या संमेलनासाठी आमंत्रित केलेले आहे. तसेच सिंधुदुर्गातील उत्तम कविता लिहिणाऱ्या नव्या व जुन्या नामांकित कवयित्रींचा देखील सहभाग असणार आहे. आरती मासिकच्या वतीने सिंधुदुर्ग, गोवा मर्यादित महिला काव्य लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते संमेलनात होणार आहे.
तरी या कवयित्री संमेलनाचा साहित्य प्रेमी रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आरतीच्या कार्यकारी संपादक व आयोजक प्रतिनिधी साहित्यिक उषा परब, संस्थेचे अध्यक्ष व संपादक डॉ. जी. ए. बुवा, प्रभाकर भागवत, भरत गावडे, विठ्ठल कदम व कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी केले आहे.