सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावात सुरू असलेल्या खडी क्रशरमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याची तक्रार पुढे आली आहे. या प्रकरणी तातडीची चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी, अन्यथा २६ जानेवारी रोजी संपूर्ण कुटुंबासह उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थ नकुल गावकर यांनी दिला आहे.
सोनुर्ली येथील रहिवासी श्री. नकुल शरद गावकर यांनी तहसीलदार सावंतवाडी यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला आहे. अर्जानुसार संबंधित खडी क्रशर त्यांच्या घरापासून अवघ्या १०० ते १५० मीटर अंतरावर असून, क्रशरमधील ब्लास्टिंगमुळे त्यांच्या घराला मोठमोठे तडे गेले आहेत. त्यामुळे घर कोसळण्याची भीती निर्माण झाली असून, कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तसेच क्रशरमधून उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे नारळ, केळी, सुपारी आदी पिकांचे नुकसान होत असून शेती व्यवसायावरही विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.
या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कारवाई न केल्यास २६ जानेवारी रोजी संपूर्ण परिवारासह उपोषण करण्याचा इशारा नकुल गावकर यांनी दिला आहे.
या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सोनुर्ली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



