वेंगुर्ले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील चांदेरकरबुवा विठ्ठल मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. कमला एकादशीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमास भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प. सावळाराम कुर्ले बुवा यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेसमोर महाआरती संपन्न झाली. यावेळी अरुण सावंत बुवा यांचे कीर्तनही आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा नगरसेविका अॅड. सुषमा खानोलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवून नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रांत प्रगती केली असून भारताचे जागतिक स्तरावरील स्थान अधिक बळकट झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच राम मंदिर उभारणीसह अनेक ऐतिहासिक निर्णयांमुळे देशाच्या सांस्कृतिक आणि विकासात्मक वाटचालीला नवी दिशा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजन गिरप, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई, मंडलाध्यक्ष विष्णू (पप्पू) परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, दादा केळुसकर, युवा मोर्चाचे नगरसेवक प्रणव वायंगणकर, वृंदा गवंडळकर, सचिन शेटये, प्रशांत आपटे, रविंद्र शिरसाठ, सदानंद गिरप, विनू मोर्डेकर, अभि वेंगुर्लेकर, आकांक्षा परब, रिया केरकर, काजल कुबल, गौरी माईणकर, शरद मेस्त्री, विनय गोगटे, नाना महाजन, किरण मेस्त्री यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक भाविक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण असून उपस्थितांनी देशाच्या प्रगतीसाठी तसेच समाजकल्याणासाठी प्रार्थना केली.


