सावंतवाडी : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेने सावंतवाडीत १३ ऑगस्ट रोजी भव्य ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली ‘न भूतो न भविष्यति’ अशा स्वरूपाची करण्याचा निर्धार भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी भाजपा राज्य युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, माजी नगरसेवक मनोज नाईक, प्रसन्न देसाई, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर, सुहास गवंडळकर , रंगनाथ गवस, जिल्हा परिषद सदस्या शोभा गावडे, पप्पू परब आदी उपस्थित होते.
श्री देव उपरलकर देवस्थानचे आशीर्वाद घेऊन या भव्य रॅलीला प्रारंभ होणार असून जनरल जगन्नाथराव भोंसले शिव उद्यानात रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये माजी सैनिक बांधवांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे सावंतवाडी शहरात देशभक्तीचा उत्साह आणि तिरंग्याची शान अनुभवायला मिळणार आहे.
याच दिवशी भव्य देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी व नागरिकांना आपल्या कलागुणांच्या माध्यमातून देशभक्ती व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी सांगितले की, विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडीत विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाची ‘हर घर तिरंगा’ रॅली अत्यंत आकर्षक आणि भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या मनातील देशाभिमान जागृत ठेवत या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.



