संशयाच्या भुताने घेरलं, बायको अन् सासूलाही नाही सोडलं! ; त्या रक्तरंजित घटनेने ‘हे’ शहर हादरलं!

नवी मुंबई : पती-पत्नीमधील नातं हे विश्वासाचं नातं असतं. एकमेकांवर विश्वास ठेवूनच संसार चालवायचा असतो. तेव्हाच कुठे संसाराचा गाडा पुढे सरकतो. आपल्याकडे अॅरेंज मॅरेजची पद्धत आहे. आणि ही पद्धत केवळ विश्वासाच्या नात्यावरच टिकून आहे. त्यात जर एखाद्याचा प्रेम विवाह असेल तर त्यात विश्वासाचं नातं अधिकच बळकट असलं पाहिजे. पण डोक्यात जर संशयाचं भूत घुसलं असेल तर मग काहीच राहत नाही. अख्खा माणूस संशय पिशाच्चाने घेरला जातो आणि मग होत्याचं नव्हतं होतं. नेरूळमध्येही एक व्यक्ती असाच संशयाने पछाडला. अखेर जे व्हायचं ते झालं. आज त्याची बायको आणि सासू या जगात नाही. त्याची मात्र तुरुंगात रवानगी झाली. केवळ संशयामुळे हे घडलं. रक्तरंजित घटनेत याची अखेर झाली. नेरुळ परिसरात चरित्रावर संशय घेत झालेल्या दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय तरुणाने कथितरित्या आपल्या पत्नी आणि सासूवर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याच्या पत्नीने सुमारे 4 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना एक मुलगाही आहे. विवाहानंतर हे दाम्पत्य नेरुळ परिसरात राहत होते, तर आरोपीचे कुटुंब मुंबईत राहते. गेल्या एका वर्षापासून पत्नीच्या चारित्र्यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. कौटुंबिक कलह वाढल्यामुळे आरोपी काही काळापूर्वी आपल्या आई-वडिलांकडे राहायला गेला होता. मात्र, तो अधूनमधून पत्नीला भेटण्यासाठी नेरुळ येथे येत असे. प्रत्येक भेटीदरम्यान दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती आहे.

सासूचाही जागीच मृत्यू!

रविवारी आरोपी पुन्हा पत्नीच्या घरी आला होता. थोडसं बोलणंचालणं झाल्यावर किरकोळ कारणावरून दोघांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात आरोपीने चाकू काढून पत्नीवर सपासप वार केले. पत्नीला वाचवण्यासाठी धावून आलेल्या सासूवरही त्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि चारित्र्यावरून घेतलेला संशय हे हत्येमागील कारण असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles