मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. पावसाचा ऑरेंज अलर्ट विदर्भात जारी करण्यात आला. मराठवाड्यासह उर्वरित राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. आज राज्यात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे. अनुपगढ पिलानी दाल्तोगंज येथे वादळी वाऱ्याची प्रणाली सक्रिय झाली. कोकणात पावसाचा जोर वाढेल. यासोबतच पुणे आणि रायगड घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस होईल. सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, जळगाव, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली आणि जालना येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळमध्ये भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला.
गोदिंया, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला. मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा सर्वदूर पाऊस होताना दिसत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. जून महिना कोरडा गेला असल तरीही जुलै महिन्यात राज्यभरात समाधानकारक पाऊस झाला. नागपूरमध्येही पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली.
मराठवाड्यात तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना 29 जुलै रोजी सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. आज गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला. त्याप्रमाणे जिल्ह्यात 12 तालुक्यातही चांगल्या पावसाची नोंद झाली.
गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणातून सध्या नदीपात्रात 4862 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना येलो अलर्ट’ जारी केला आहे. पुजारीटोला धरणाचा पाणीसाठा सध्या 88 टक्के झाला आहे… त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून पाण्याच्या विसर्ग सुरू.




