पुणे : देशाचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या आधीच पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एनएसयूआयमध्ये पुण्यातील शिवाजीनगर येथील सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठ येथे राडा झालाय. यात दोन्ही गटाकडून मारहाण झाल्याचं आरोप करण्यात आला असून या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देत सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, पुण्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता, सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून मोठा असंतोष आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच भाडोत्री गुंड पाठवून हा कार्यक्रम उधळण्याचा आणि स्टंट करण्याचा कट रचला गेला आहे, अस त्यांनीं सांगितलं.
राहुल गांधी यांचे स्टेटस ठेवलं म्हणून विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवलं-
पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलंय. यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सीईओपी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवण्याचा अभविपच्या गुंडगिरीचा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. फक्त राहुल गांधी यांचे स्टेटस ठेवलं म्हणून मुलींना धमकावण्याचा आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गुंडांना कोणी दिला आहे? असा प्रश्नही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी उपस्थित केला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या गुंडांना सरकारचं संरक्षण आहे का?
विचारांचा सामना विचारांनी करता येत नाही म्हणून मारहाण, धमकी आणि दहशतीचा मार्ग स्वीकारायचा हीच भाजपच्या विद्यार्थी राजकारणाची संस्कृती आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या गुंडांना सरकारचं संरक्षण आहे का? असेल तर विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि मुलींच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या गुंडगिरीसमोर काँग्रेस कधीही झुकणार नाही, असं यावेळी त्यांनी सांगितल.



