हिंदुत्व विचारांचे सरकार अन् ‘बाप्पा’च्या आगमनाआधीच गणेशभक्तांच्या घरात अंधार! ; गणपतीच्या तोंडावर वीज कनेक्शन कट, बाबुराव धुरींचा महावितरणला थेट इशारा! ; ‘ही नोटंकी बंद करा, नाहीतर ऑफिसमध्ये बसू देणार नाही!’

दोडामार्ग : राज्यात हिंदुत्वाचा विचार मानणारे सरकार सत्तेत असताना हिंदूंच्या सर्वात मोठ्या आणि भावनिक गणेशोत्सवाच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या घरात अंधार करण्याचा प्रकार सुरू आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच महावितरणच्या कुडाळ मंडलाकडून सावंतवाडी-दोडामार्ग परिसरातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन्स थेट तोडली जात असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव दत्ताराम धुरी यांनी केला आहे.

घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होणार, आणि त्याचवेळी महावितरण शेतकऱ्यांच्या घरातील वीज कापून अंधार करणार, हा नेमका कोणता कारभार?’ असा संतप्त सवाल धुरी यांनी उपस्थित केला आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून कोकणच्या जनजीवनाशी आणि भावविश्वाशी जोडलेला उत्सव आहे. अशा मंगलमय वातावरणात शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या तोडण्याची कारवाई करणे योग्य आहे का, असा सवाल करत महावितरणने गणपतीच्या तोंडावर सुरू केलेली ही कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणी धुरी यांनी केली.

‘शेतकऱ्यांना अंधारात ठेवून सण साजरा करायचा तरी कसा?’

गणपतीच्या सणासाठी प्रत्येक घरात तयारी सुरू आहे. घराघरांत रोषणाई, पूजा साहित्याची लगबग आणि बाप्पाच्या स्वागताची धामधूम सुरू असताना वीज कनेक्शन तोडून शेतकरी कुटुंबांवर अंधाराचे संकट लादणे संतापजनक आहे, अशी भूमिका धुरी यांनी मांडली.

गणपतीच्या सणासुदीच्या तोंडावर वीज कनेक्शन कट करण्याची नोटंकी तातडीने बंद करा. शेतकऱ्यांना वेठीस धरू नका. अन्यथा महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना कुडाळ कार्यालयात बसू देणार नाही,’ असा थेट इशाराच बाबुराव धुरी यांनी दिला.

शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने भूमिका घ्यावी. सणाच्या काळात जनतेच्या घरात दिवे लावण्याऐवजी वीज कनेक्शन तोडून अंधार पसरविण्याची कारवाई खपवून घेतली जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाबुराव धुरी यांनी घेतला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles