निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या ‘त्या’ रुग्णवाहिका गेल्या कुठे?, वेळेवर उपचाराअभावी रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचे सत्र सुरूच!

  • सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा .
  • मनसेतर्फे येत्या १५ ऑगस्ट रोजी आंदोलन! : जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांचा इशारा. 
  • सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी तालुक्यात माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या मार्फत तसेच अपक्ष उमेदवार यांच्या मार्फत मोठा गाजावाजा करून अनेक रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं होत. या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी मोठ मोठ्या घोषणा करून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आल मात्र निवडून आलेले लोकप्रतिनिधी आता जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात गेले काही महिने फिजिशियन उपलब्ध नाही, वैद्यकीय अधिकारी वर्ग २ ची ५ पदे रिक्त आहेत.तसेच भूलतज्ज्ञ , आहार तज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, औषध निर्माता, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ वरिष्ठ व बाह्य रुग्ण विभाग लिपीक एकूण ४ पदे , हि व अशी अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. योग्य व तातडीच्या उपचाराअभावी गंभीर रुग्ण प्राण सोडत आहेत. रात्रीच्या वेळी गंभीर रुग्ण दाखल झाला तर त्याला परस्पर गोवा बांबोळी येथे घेऊन जाण्याचा सल्ला येथे असलेले शिकाऊ डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना देतात. नातेवाईक गंभीर रुग्ण बांबोळी येथे घेऊन गेले असता तेथील डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला दोष देतात.तसेच वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास रुग्णाला उपचाराअभावी आपले प्राण देखील गमवावे लागत आहेत. अलीकडेच कारिवडे येथील अपघातात एका तरुण रुग्णाला उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागले आहेत. रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असून यात सरपटणारे प्राणी फिरत आहेत.फक्त खोटी आश्वासने देऊन निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीनी जनतेच्या आरोग्याच्या समस्यांवर उपाययोजना करण्याऐवजी लोकांच्या तोंडाला पाने फुसण्याचे काम केलेले आहे. दर निवडणुकीत नवा अजेंडा घेऊन येणाऱ्या आमदार माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिलेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यात स्वप्न हवेत विरल आहे. या व अशा आरोग्याच्या अनेक समस्यांवर आवाज उठविण्यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून शासनाला जाग आणण्यासाठी या उपोषणामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हाव अस आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles