मुंबई : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप योग्य मार्गावर असल्याचं म्हटलं आहे. आमची आतापर्यंत 125 जागांवर सहमती झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक जिंकणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. मविआ 288 पैकी 180 जागा जिंकेल, असं बाळासाहेब थोरात यांनी ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा दावा करण्यासोबतच बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेबद्दल देखील माहिती त्या मुलाखतीत दिली आहे. मविआच्या जागा वाटपाच्या चर्चा अनंत चतुर्दशी नंतर पुन्हा सुरु होतील, असं ते म्हणाले. मविआची प्रचार मोहीम कशी असेल याबाबतचा निर्णय देखील त्यानंतर घेण्यात येईल, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
जागावाटपाची चर्चा लवकरच सुरु होणार –
महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि काँग्रेस हे तीन पक्ष प्रमुख आहेत. मविआच्या जागा वाटपाच्या आतापर्यंत तीन फेऱ्या झालेल्या आहेत. गणेशोत्सव असल्यामुळं जागा वाटपच्या चर्चा सध्या थांबलेल्या आहेत. अनंत चतुर्दशीनंतर त्या सुरु होतील, असंही थोरात यांनी म्हटलं.
महाराष्ट्रात तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता असल्याबाबतच्या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांनी भाजपचं राजकारण अशाच प्रकारचं आहे, ते थेट लढत नाहीत. मतांचं विभाजन करुन विजय मिळवण्यासाठी ते अशा गोष्टी करतात, असं म्हटलं. भाजपकडून असे प्रकार अनेक वर्ष केले जात आहेत. मात्र, यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत होईल, असंही त्यांनी म्हटलं.
बाळासाहेब थोरात यांनी महायुतीच्या कारभारावर देखील टीका केली. महायुतीच्या पक्षांमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच आहे, प्रशासकीय प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलंय, भाजपचा मित्रपक्षांच्या जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. लोक या सर्व गोष्टी पाहत आहेत, असं देखील बाळासाहेब थोरात म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाविकास आघाडीची राज्यात सत्ता येणार असल्याचं म्हटलं होतं. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत 183 जागा मिळतील, असा दावा केला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं 48 पैकी 30 जागा जिंकल्या होत्या. तर, महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं.