मुंबई :: सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. तसेच ग्रामसेवकपदाचं नाव बदलण्याचाही निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार आता ग्रामसेवकपद हे ग्रामविकास अधिकारी अशा नावाने ओळखले जाणार आहे.
अशी झाली मानधनात वाढ –
ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार पर्यंत आहे, त्या सरपंचाचे मानधन ३ हजार रुपयावरुन ६ हजार रुपये करण्यात येणार आहे. तर ज्या उपसरंपचाचे मानधन १ हजारावरुन २ हजार रुपये करण्यात येणार आहे.
* ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार ते ८ हजारापर्यंत आहे, त्या सरपंचाचे मानधन ४ हजारांवरून ८ हजार करण्यात आले आहे. तर उपसरपंचाचे मानधन १५०० रुपयावरुन ३ हजार रुपये करण्यात आले आहे.
*ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८ हजारांपेक्षा जास्त आहे, त्या सरपंचाचे मानधन ५ हजारांवरून १० हजार रुपये करण्यात आले आहे. तर उपसरपंचाचे मानधन २ हजारावरून ४ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे देखील विलीन करण्यात आली आहेत. आता ग्रामविकास अधिकारी असे एकच पद अस्तित्वात असेल. तर ज्या ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न ७५ हजार आहे. त्या ग्रामपंचायतींना १० लाखांपर्यंतचा निधी दिला जाईल. त्याचबरोबर ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनातही २० टक्के वाढ करण्यात आल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.