सावंतवाडी : सावंतवाडी शहर आणि तालुक्यातील सतरा दिवसांच्या गणरायाला मोठ्या भक्तीभावानं निरोप देण्यात आला. शहरातील श्री देव नरसोबा गणपती व सालईवाडा भट्टीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाला मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष व फटाक्यांच्या आतषबाजीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.
गेले सतरा दिवस आरती, भजन, भक्तिमय गीतांच्या आवाजाने सर्वत्र भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरा १७ दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकांस प्रारंभ झाला. श्री देव नरसोबा गणपतीची पालखी मिरवणूक खास आकर्षण ठरली. ढोल पथक, महिलांच्या फुगड्या लक्षवेधी ठरल्या. कार्टून मधील पात्र चिमुकल्यांच आकर्षण ठरली. सालईवाडा येथील गणेशोत्सव मंडळाचा डिजे व शंकराच रूप घेतलेला देखावा लक्षवेधी ठरला. रात्री उशिरा मोठ्या भक्तिभावाने गणराला निरोप देण्यात आला. विसर्जनस्थळी मोती तलाव येथे नगरपरिषदेच्यावतीन खास आयोजन करण्यात आलं होतं. पोलिसांचा ही कडक बंदोबस्त होता. गणरायाला भक्तिभावाने निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. गणेशभक्तांना कोणतीही उणीव भासू नये, यासाठी यंदाही चोख व्यवस्था केली होती.