सावंतवाडी: मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी सावंतवाडीत एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक सकाळी ११ वाजता मोती तलावासमोर असलेल्या श्रीराम वाचन मंदिर येथे पार पडणार आहे.
या सभेला राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी श्री. निवृत्ती देसाई,श्री. बजरंग चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. श्याम कुंभार यांनी कामगार व वारसांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ , दोडामार्ग आणि कणकवली परिसरातील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईतील घरांच्या सद्यस्थितीबद्दल माहिती देणे हा या सभेचा मुख्य उद्देश आहे. तसेच, घरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भविष्यात कराव्या लागणाऱ्या आंदोलनाची रूपरेषाही या बैठकीत ठरवण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त गिरणी कामगारांनी आणि त्यांच्या वारसांनी या सभेला वेळेवर उपस्थित राहून आपल्या हक्काच्या घरासंबंधीची माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



