– रूपेश पाटील.
सावंतवाडी : कोकणातील राजकारणात पुन्हा एकदा राणे यांच्या प्रभावाची चर्चा रंगली असून विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे राजकीय वजन पुन्हा अधोरेखित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळ माने यांच्या माघारीमुळे निवडणुकीचे समीकरणच बदलले आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत ताकद लावली होती. मात्र अर्ज माघारीच्या निर्णयामुळे विरोधकांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या घडामोडीनंतर भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातील राजकारणात राणे कुटुंबाचा प्रभाव कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
या घडामोडीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या राजकीय संकेतांच्या रूपात पाहिले जात असून कोकणातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



