- महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त; मनसेची टीका.
- मनसे पदाधिकाऱ्यांची सावंतवाडीत बैठक, सामाजिक उपक्रमांवर भर.
सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी होणारा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा, असे आवाहन मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत यांनी केले.
सावंतवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्ष संघटनात्मक बांधणी, आगामी कार्यक्रम आणि पक्षवाढीच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
श्री. सावंत म्हणाले, “मनसेच्या विचारांवर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग आजही पक्षासोबत आहे. सध्याच्या राजकारणात पैशाचे वाढते महत्त्व असतानाही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निष्ठेने काम करत आहेत. सत्ताधारी पक्षांविषयी सर्वसामान्य जनतेत भ्रमनिरास निर्माण झाला असून वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे जीवन अधिक कठीण झाले आहे. महागाईच्या वाढत्या झळा सामान्य जनतेला सोसाव्या लागत आहेत.”
बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रम, जनसंपर्क मोहीम तसेच राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, धीरज परब, सुधीर राऊळ, कुणाल किनळेकर, गणेश वाईरकर, राजू कासकर, सुनील आसवेकर, काशीराम गावडे, चिन्मय नाडकर्णी, विष्णू वसकर, केतन सावंत, राज सावंत, संतोष शेळके, समीर म्हापणकर, सूरज राऊळ, गुरुदास गवंडे, श्रीराम सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.


