✍️ रूपेश पाटील.
सावंतवाडी : कोकणातील बागायतदारांच्या डोळ्यांत अश्रू आहेत, मच्छीमार बांधवांचे संसार संकटात सापडले आहेत, तर राज्यभर पाणीटंचाई आणि दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहे. अशा वेदनादायी परिस्थितीत स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी जनतेच्या दुःखात सहभागी होण्याचा मोठा आणि संवेदनशील निर्णय राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे.
२३ जून रोजी येणारा आपला वाढदिवस यंदा कोणत्याही प्रकारे साजरा करणार नसल्याचे त्यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे जाहीर केले. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, पावसाने दडी मारल्याने मच्छीमार बांधवांची झालेली परवड आणि एल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“जनता संकटात असताना उत्सव साजरा करण्यापेक्षा त्यांच्या वेदनांशी एकरूप होणे अधिक महत्त्वाचे आहे,” असा भावनिक संदेश त्यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी आपल्या सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये, असे आवाहन करत प्रत्येकाने आपल्या परिसरात गो-सेवा, गरजूंना मदत, वृक्षारोपण, अन्नदान आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे सांगितले आहे.
“गौसंवर्धन आणि समाजहिताची कामे हीच माझ्यासाठी वाढदिवसाची सर्वोत्तम भेट असेल. तुमचा सेवाभाव आणि जनतेसाठीची तळमळ हाच माझ्यासाठी लाखमोलाचा आशीर्वाद आहे,” असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले.
वाढदिवसाच्या शुभेच्छांपेक्षा समाजासाठी केलेली सेवा अधिक महत्त्वाची असल्याचा संदेश देत मंत्री नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना समाजकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले असून आपल्या संदेशाचा शेवट “जय श्रीराम” या घोषणेने केला आहे.
एका लोकप्रतिनिधीने स्वतःचा उत्सव बाजूला ठेवून जनतेच्या वेदनांना प्राधान्य दिल्याची ही भूमिका सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.



