सावंतवाडी : “शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्या, मोठी स्वप्ने पाहा आणि समाजासाठी कार्य करण्याची वृत्ती जोपासा,” असा प्रेरणादायी संदेश सावंतवाडीचे आमदार तथा माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात दिला. कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने त्यांनी मोबाईलद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. तसेच मुंबईचे पालकमंत्री असताना समाजातील दानशूर व्यक्तिमत्त्व भागोजी कीर यांच्या स्मरणार्थ १० कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर केल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या संदेशात केला.

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने आयोजित हा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. “गुणांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी,” या भावनेने आयोजित या सोहळ्यात तालुक्यातील तब्बल १४० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
गुणवत्तेचा आणि गुणवंतांचा गौरव!
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.यानंतर मंडळाचे कार्यकर्ते विकी केरकर यांनी प्रभावी आणि ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करत मान्यवरांचा परिचय करून दिला आणि शिक्षणाचे महत्त्व विशद केले. मंडळाचे सदस्य संजय पिळणकर यांनी वार्षिक अहवाल सादर करत वर्षभरातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याचा आढावा मांडला.
गुणवत्तेला सर्वोच्च स्थान देताना सावंतवाडी तालुक्यात दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. भार्गवी अंकुश शेटवे हिचा जात, धर्म किंवा पंथाचा विचार न करता विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच ज्ञातीतून तालुक्यात प्रथम आलेली कु. साक्षी भूषण गवंडी हिचाही विशेष गौरव करण्यात आला. इतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू देण्यात आल्या.
’भंडारी रत्न’ पुरस्कार व दत्तक पालक योजना –
बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, समाजोपयोगी कार्य आणि शैक्षणिक संस्थांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांची दखल घेत डॉ. प्रा. दिनेश बाबू नागवेकर यांना या वर्षीचा मानाचा ‘भंडारी रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाध्यक्ष सुदान उर्फ सुधा कवठणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
तसेच ‘दत्तक पालक योजना’ अंतर्गत समाजातील दानशूर व्यक्तिमत्त्वे सुधीर पराडकर आणि चंद्रकांत वाडकर यांनी काही विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी उचलली.
विशेष अतिथी पोलीस उप निरीक्षक माधुरी मुळीक यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, चारित्र्य, सामाजिक जबाबदारी आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व पटवून दिले. “परिस्थिती कधीही माणसाला थांबवू शकत नाही; कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ध्येय गाठता येते,” असा संदेश त्यांनी दिला.
नगरसेवक देव्या सूर्याजी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात सुदन कवठणकर यांनी “प्रयत्नांती परमेश्वर” या उक्तीचा संदर्भ देत कठोर परिश्रम आणि शिस्त हाच यशाचा मार्ग असल्याचे सांगितले. भंडारी मंडळ कायम गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मान्यवरांची उपस्थिती –
या सोहळ्यास भंडारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर, सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष दत्तप्रसाद अरविंदेकर, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, कार्यक्रमाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सुदन उर्फ सुधा कवठणकर, सरपंच अजित कवठणकर, हनुमंत पेडणेकर, दीपिका भैरें, सायली साळगावकर, समीर केरकर, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते, महेश धुरी, श्रीमती नेहा कांबळी, तसेच देविदास आडकर, बाळा आकेरकर, नंदकिशोर कोंडये, संजय पिळणकर, भरत कांबळी, प्रतिभा कांबळी, मंडळाचे सचिव दिलीप पेडणेकर, महिला वसतिगृह अध्यक्षा शीतल नाईक, समता सूर्याजी, राजन भाईडकर, भाऊ कोचरेकर, ज्ञानदीप राऊळ, विकी केरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, पालक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



