कधी काळी महात्मा गांधींजींनी ‘खेड्यांकडे चला.!’ हा नारा जनतेला दिला होता. परंतु तत्कालीन व नंतरच्या राज्यकर्त्यांना हा विचार फारसा पटला नाही. सर्व साधारणपणे गेल्या ७०-७५ वर्षामध्ये आपल्या देशात शिक्षणाने खूपच प्रगती केली. ग्रामीण भागात असणाऱ्या रस्ते, पाणी, वीज , यासारख्या सुविधामध्ये देखील खूपच सकारात्मक वाढ केली.
आमचे बालपण खेड्यात गेल्यामुळे तत्कालीन गैरव्यवस्था काय होत्या हे आमच्या पिढीला चांगलेच माहीत आहे. तत्कालीन ग्रामीण संस्कृतीची देखील काही भलीबुरी वैशिष्टये होती. त्यामध्ये अगदी साध्या साध्या कारणाने , हाणामाऱ्या, शिवीगाळ, नको तितका जातीचा, पैशाचा, बडेजाव या गोष्टी तर नित्याच्याच होत्या.
खरे तर संघर्ष ही आपली सहजप्रवृत्ती आहे. त्यामुळे त्या संघर्षाचे रूपांतर मारामारीत होणे हे साहाजिकच होते व त्याचाच एक प्रकार म्हणजे शिव्या देणे. आम्ही शिक्षण घेवून गेल्या ५०-६० वर्षापासून शहरात आल्यामुळे आता त्या शिव्या विसरल्या गेल्या होत्या. शिक्षणाने माणसे सुसंस्कृत होतात असे समजले जाते. त्याचाही हा परिणाम असावा.
परंतु अलिकडे आपण कितीही प्रगती केली तरी आपल्या मातीशी नाळ तुटता कामा नये असा विचार प्रबळ झालेला असल्यामुळे किंवा निवडणुका जवळ आल्याने असेल , महात्मा गाधींचा संदेश आचरणात आणायचा असे राजकीय नेत्यांना वाटू लागलेले दिसते . त्यामुळे राजकीय नेत्यांनी पूर्वीच्या ग्रामीण भागातील लोकांच्या शिव्यांची आठवण जनतेला करून देण्याचे ठरविलेले दिसते. त्यामुळेच ,”तुला उभा गाडीन”, “तुला उघडा करून मारीन”, “मी अमक्याची औलाद” , तुम्ही अमक्याची औलाद” , अमुक एक एका बापाची औलाद नाही , इतकेच काय पण मुलगी म्हणते बापाच्या कार्यकर्त्या चा हात तोडीन , काही शिव्या तर सभ्यतेच्या चौकटीत बसत नाहीत म्हणून TV वाल्यांना बीप करावे लागते , तर वर्तमान पत्रवाल्यांना xx xफुल्या माराव्या लागतात.
या राजकीय पक्षांनी आपले प्रवक्ते नेमण्यासाठी शिव्या देण्यात प्रवीणतेची कसोटी लावलेली असावी असे दिसते. आमची पिढी ज्या शिव्या विसरली होती त्यांचे स्मरण करून दिले जात आहे. यशवंतराव चव्हाण म्हणत असत, “निवडणुकीचा प्रचार म्हणजे लोकशिक्षण होय”. म्हणजे आता पुढील दोन तीन महिने आपणास किती आणि कोणते शिक्षण मिळणार आहे याची कल्पनाच न केलेली बरी!
– डॉ. ह. ना. जगताप.